तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंना एन्ट्री मिळणार? काय म्हणाले राजू शेट्टी?
19-Sep-2024
Total Views | 125
पुणे : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरु आहे. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मिळून ही तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. दरम्यान, या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. त्यांना टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
राजू शेट्टी म्हणाले की, "आम्ही एक व्यापक आणि आश्वासक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला शेतकरी चळवळीशी संबंधित असणारे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, शरद जोशी, माजी आमदार वामनराव चटप यांच्यासोबत एक बैठक घेऊन शेतकरी चळवळीतील सर्व नेत्यांना एकत्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमच्यासोबत माजी सैनिक, महाराष्ट्र विकास आघाडी आणि स्वंतत्र विदर्भवादी संघटना आली. आता आमची प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर मनोज जरांगेंशीही आमची चर्चा सुरु आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "या महाराष्ट्रात चळवळीची पार्श्वभूमी असणारे अनेक छोटेमोठे पक्ष आहेत. ते सतत जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतात. महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगार, शेतमजूर, कामगार वर्ग या सर्वांचे प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.