मुंबई : आषाढ ते कार्तिक या चातुर्मासाच्या कालावधीत भगवान विष्णु निद्रिस्त अवस्थेत जातात. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी ते निद्रिस्त अवस्थेतून बाहेर येतात. या दिवसाला ‘प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशी’ असे म्हणतात. मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी हा दिवस संपन्न झाला. आषाढी एकादशीच्या दिवशी जसा पंढरपूरात मोठा उत्सव असतो, तसाच कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीच्या ( Tulasi ) दिवशीही असतो.
प्रबोधिनी एकादशीनंतर तुळशी विवाहाला प्रारंभ होता. राज्यभरात तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते, असेही काही लोक मानतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुळशीविवाहाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी तुळशीचे लग्न बाळकृष्णासोबत लावले जाते, तर काही ठिकाणी शाळिग्राम अवतारातील भगवान विष्णुंसोबत. या दिवशी अंगणातील तुळशी वृंदावन सजवले जाते. तिला आकर्षक रंगांनी रंगवले जाते. काही ठिकाणी त्या वृंदावनाला साडी किंवा ओढणी चढवली जाते. तुळशी शेजारी आकर्षक रांगोळी काढली जाते. तुळशीला नथ, बांगड्या, सोन्याचे दागिने घालून तिला नवरीसारखे सजवले जाते. त्यानंतर बाळकृष्ण किंवा शाळिग्रामसोबत मध्ये अंतरपाट धरून विधीवत तिचे लग्न लावले जाते. त्यावेळी मंगलाष्टकासुद्धा म्हटल्या जातात. तुळशीशेजारी लग्नात उस ठेवला जातो. लग्नानंतर तुळशीची खण आणि नारळाने ओटीसुद्धा भरली जाते. एकदा का तुळशी विवाह झाला की, मग लग्नाचे शुभमुहूर्त सुरू होतात, असे मानले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्नासाठी स्थळ बघायला किंवा लग्नाचा मुहूर्त ठरवायला सुरूवात केली जाते.
चातुर्मासात निद्रिस्त अवस्थेत गेलेले देव भक्तांच्या कल्याणासाठी कार्तिकी एकादशीच्या दिवशी जागे होतात, म्हणून या दिवसाला आपण ‘प्रबोधिनी किंवा देवउठणी एकादशी’ म्हणतो. या चातुर्मासाच्या कालावधीत विवाहकार्य संपन्न होत नाही. चातुर्मास संपला की, कार्तिकी एकादशीच्या दिवशी किंवा द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णुंचा तुळशीसोबत विवाह संपन्न झाला की, मग विवाहासाठी शुभमुहूर्त सुरू होतात. या वर्षी बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तुळशी विवाह होणार आहे. सायंकाळी कोणत्याही वेळी आपण तुळशी विवाह करू शकतो.