नवी दिल्ली : “मदनदास देवी म्हणजे व्यक्तीनिर्माण आणि संघटनानिर्माणाचे अद्भूत शिल्पकार होते. कार्यकर्ता पारखून त्याच्याकडे नेमकी जबाबदारी देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) माजी राष्ट्रीय संघटनमंत्री आणि रा. स्व. संघाचे माजी सह-सरकार्यवाह मदनदास देवी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मदनदास देवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे अभाविप आणि रा. स्व. संघाचे असंख्य कार्यकर्ते - स्वयंसेवक उपस्थित होते.
मदनदास देवी यांच्या निधनामुळे असंख्य कार्यकर्त्यांना अनाथ झाल्यासारखे वाटत आहे. मदनदासजींनी १९७२ सालापासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत संघटनेस मार्गदर्शन केले होते. ते व्यक्तीनिर्माण आणि संघटनानिर्माणाचे अद्भूत शिल्पकार होते. त्याचप्रमाणे व्यक्तीची नेमकी पारख करणे, त्यास त्याच्या गुण-दोषांसकट स्विकारणे आणि त्याच्यावर जबाबदारी देणे ही त्यांची कार्यशैली होती. ते कार्यकर्त्यांना स्नेह द्यायचे त्याचप्रमाणे त्यांच्या चुकाही अतिशय स्पष्टपणे दाखवून द्यायचे. संघटनशास्त्राच्या आधारभूत तत्त्वांना ते पूर्णपणे जगले होते. अभाविपचे संस्थापक यशवंतराव केळकर यांना मदनदासजी देशभरातील संघटनकार्याची अतिशय बारकाईने माहिती देत असत. निरिक्षणशक्ती हे त्यांचे बलस्थान होते. व्यक्तीचे बोलणे, त्याचे हावभाव याचे अतिशय बारकाईने निरिक्षण करून ते संवाद साधत असत. पद मिळाल्यावर जबाबदारी विसरू नये, अशी अतिशय महत्त्वाची शिकवण मदनदासजींची असल्याचे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले.
मदनदासजींनी अतिशय प्रतिकूल काळात कार्यकर्ते आणि संघटना उभी केल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सामुहिकतेमध्ये अनामिकतेची शिकवण त्यांनी आम्हाला दिली. एखाद्या विषयावर सर्वसंमती आणण्यासाठी अखेरपर्यंत थांबत असत. अभाविपला खर्या अर्थाने राष्ट्रीय स्वरूप देऊन जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना बनवण्यामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी आणिबाणीसारख्या संकटाच्या काळातही संघटना कार्यरत ठेवली. त्यामुळे आज देशभरात त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले असंख्य कार्यकर्ते समाजहिताचे काम करत असल्याचेही नड्डा यांनी यावेळी सांगितले.
मदनदास देवी म्हणजे राष्ट्रीय विचारधारेचे प्रमुख चिंतक असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. सीए असतानाही समाजासाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांनी अभाविपला तब्बल २२ वर्षे कार्यरत राहून आकार देण्याचे काम केले. अभाविपमध्ये कार्यरत असताना मदनदासजी हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांचेही मत विचारात घेत असत, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले आहे.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, रा. स्व. संघाचे सह-सरकार्यवाह अरुण कुमार, डॉ. कृष्णगोपाल, सुरेश सोनी उपस्थित होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कैलास विजयवर्गीय, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदी उपस्थित होते.