मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे (४५ वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कावळे मुंबईत कधी आले त्यांच्यासोबत कोण होते? या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. नोटच्या शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सुनील कावळेंच्या आत्महत्येची माहिती ट्विट करत दिली. “आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!" असं विनोद पाटील म्हणाले.