मुंबई : राज्यात आता फक्त मंत्रालयाच अस्तित्वात आहे, सचिवालय अस्तित्वात नाही असे उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला. "राज्यात बहुमत असताना कुठलेही निर्णय घेतले नाहीत आणि बहुमत गमावल्यावर आणि राज्यपालांकडून पत्र आल्यावर धडाधड निर्णय घेतले हा प्रकार का केला? तेव्हा तुम्हांला ते सुचले नाही" असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते त्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ खडसे यांच्या आधी शिवसेनेचे विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही याच मुद्दयावरून सरकारवर टीका केली होती. राज्यात सध्या पूरस्थिती आहे पण मदत यंत्रणा, आपत्कालीन सुविधा पुरवायला शासकीय यंत्रणाच जागेवर नाही असा आरोप सचिन अहिर यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही विधानपरिषदेत याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता पण देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडला.