मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणतील कथित सहभाग, त्यातून राऊतांना ईडीकडून झालेली अटक, प्रवीण राऊतांनी केलेले आरोप आणि विरोधकांकडून उडवण्यात आलेली आरोपांची राळ यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या गोरेगांवच्या पत्राचाळ प्रकरणाची राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. बड्या आसामींच्या सहभागामुळे आणि त्यातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचारामुळे जरी हा प्रकल्प चर्चेच्या केंद्रस्थानी आला असला तरी या चाळींच्या पुनर्विकासाचा मुळ प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मागील सोळा वर्षांपासून गोरेगांवच्या सिद्धार्थ नगरमधील रहिवासी आपल्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत असून अजूनही पुनर्विकास प्रकल्पाचे काम संथगतीनेच सुरु असल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.
मविआकाळात प्रकल्पात दिरंगाई - प्रकल्पबाधित
'राज्यात २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात या प्रकल्पाचे काम अधिकच धीम्या गतीने झाले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला खरा मात्र त्याला आवश्यक तेवढा वेग मात्र मिळाला नाही. आम्हाला राजकीय घडामोडींमध्ये फारसे स्वारस्य नसून लवकरात लवकर घरे कशी मिळतील याकडे आमचे डोळे लागले आहेत.' असे प्रकल्पग्रस्तांनी म्हटले आहे.