मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांनी ठाकरे सरकारचे कान टोचल्यावर, पवारांनी फक्त समन्वय नव्हता असे म्हटले, त्यांचा विरोध नाही अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे. हा नामांतराचा विषय आमच्या कार्यक्रमपत्रिकेत नव्हता अशा शब्दांत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचे कान टोचले होते यावर आम्ही समन्वयाने मार्ग काढू अशी ठोकळेबाज प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडणार हे स्पष्ट झाल्यावर झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर आणि उन्मानाबादचे नामकरण धाराशिव असे करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयांची कुठलीच माहिती आपल्याला नव्हती आणि हा विषयही आपल्या कार्यक्रम पत्रिकेत नव्हता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या प्रतिक्रियेवरून शिवसेनेने आपल्या अजेंड्यावरचे विषय पूर्ण करून घेतले असले तरी शिवसेनेच्या अजेंडयावरचे विषय हे महाविकास आघाडीच्या अजेंडयावरचे विषय नव्हते हे उघड झाले आहे, यातून महाविकास आघाडीमधला बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.