किशोरी पेडणेकर
ओंकार देशमुख
मुंबई : 'मागील काही दिवसांत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत.त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची एकप्रकारे कबुली देणाऱ्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांवर कुठलेही तथ्यात्मक उत्तर न देता भावनिक हत्यार वापरून मुख्य मुद्द्याला बगल दिली जात आहे. भाजपवर टीका करणे, लोकांची सहानुभूती मिळवणे आणि लोकांना भडकविणे हेच ठाकरे गटाच्या हातात राहिले आहे. आपल्या सासूबाईंच्या मृत्यूबाबत पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया तर केवळ अशोभनीय आणि सहानुभूती मिळवण्याचा कळस होता. त्यामुळे माजी महापौरांच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे त्यांच्या गुन्ह्यांची कबुली देत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने मुंबई महापालिकेतील साडेबारा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी 'कॅग' संस्थेला परवानगी देण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. यावर मुंबई भाजपचे नेते प्रभाकर शिंदे यांनी 'दैनिक मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई महापालिकेतील साडेबारा हजार कोटींच्या गैरव्यवहारांची कॅगतर्फे चौकशी होणार आहे. पहिली प्रतिक्रिया काय ?
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी होण्याची बाब अत्यंत स्वागतार्ह असून त्यातून मुंबईकरांच्या घामाच्या पैशांची चोरी कुणी केली हे स्पष्ट होणार आहे. कोरोनाकाळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोणत्या कामांसाठी हजारो कोटींचा खर्च कुठे केला आणि त्याचा अपव्यव झाला आहे का ? याची चौकशी होणे गरजेचे आहे ही भूमिका आम्ही महापालिकेतील भाजप नेत्यांनी सातत्याने लावून धरली होती. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका घेत 'कॅग' चौकशीची घोषणा केली आहे. या घोषणेचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. हा आकडा बारा हजार कोटींचा आहे की याची व्याप्ती अधिक आहे हे चौकशी सुरु झाल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. महापालिकेत मागील अडीच वर्षांमध्ये झालेला भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे, त्यामुळे त्याची चौकशी होणे योग्यच आहे.
महापालिकेतील अधिकारी - सत्ताधारी आणि कंत्राटदारांमधील संबंधांवर सातत्याने भाजपाकडून अंगुलीनिर्देश करण्यात आले. त्यावर कारवाई होणार का ?
महापालिकेचा आणि पर्यायाने सर्वसामान्य मुंबईकरांचा श्रमाचा पैसा लुबाडणाऱ्या आणि त्याचा गैरवापर करणाऱ्या मंडळींनी स्वतःची एक यंत्रणा उभी केली होती. त्यातूनच हे हितसंबंध निर्माण झाले होते. या घोटाळ्यांच्या चौकशीत अधिकारी - सत्ताधारी आणि कंत्राटदारांमधील संबंधांची देखील झाडाझडती व्हावी अशी आमची त्यावर देखील कारवाई होईल, असा आम्हाला विश्वास आहे. कोविड काळात मास्क, पीपीई कीट, मृतदेह ठेवण्याच्या पिशव्या आणि इतर अनेक वैद्यकीय वस्तूंच्या खरेदीत प्रचंड गैरव्यवहार झालेले आहेत. कंत्राटदारांची नेमणूक किंवा कंत्राटे देण्यासाठी राबवण्यात आलेली यंत्रणा या सगळ्यात सत्ताधारी मंडळी अखंडपणे भ्रष्टाचारात बुडाली होती, हे समोर आले होते. त्यामुळे कंत्राटदार - सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमधील हे आर्थिक हितसंबंध उघडपणे समोर येतील हा मला विश्वास आहे.
एसआरए घोटाळ्यातील चौकशीपूर्वी 'किरीट सोमय्या माझे भाऊ आहेत आणि ते त्यांचे काम प्रामाणिकपणे करत आहेत,' अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली होती आणि त्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजप नेत्यांच्या बाबतीत ठाकरे गटाच्या बदलत असलेल्या भूमिकेकडे कसे पाहता ?
मागील काही दिवसांत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून देण्यात येणाऱ्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत.त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची एकप्रकारे कबुली देणाऱ्या आहेत. ज्या किरीट सोमय्यांवर पुणे महापालिकेच्या आवारात प्राणघातक हल्ला शिवसैनिकांनी केला, तेव्हा ही बंधुत्वाची भावना कुठे होती ? याच सोमय्यांवर मुंबईतील पोलीस स्थानकाच्या बाहेर, यवतमाळमध्ये आणि अशा अनेक ठिकाणी जेव्हा जीवघेणे हल्ले केले गेले, तेव्हा ही बंधुत्वाची भावना का जागृत झाली नव्हती ? हा माझा सवाल आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून भाजपच्या आरोपांवर कुठलेही तथ्यात्मक उत्तर न देता भावनिक हत्यार वापरून मुख्य मुद्द्याला बगल दिली जात आहे. भाजपवर टीका करणे, लोकांची सहानुभूती मिळवणे आणि लोकांना भडकविणे हेच ठाकरे गटाच्या हातात राहिले आहे. आपल्या सासूबाईंच्या मृत्यूबाबत पेडणेकरांनी दिलेली प्रतिक्रिया तर केवळ अशोभनीय आणि सहानुभूती मिळवण्याचा कळस होता. त्यामुळे माजी महापौरांच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे त्यांच्या गुन्ह्यांची कबुली देत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.