मुंबई : येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या सोशलमिडीयावरून धनगर समाजाला आवाहन केले आहे.
या व्हिडिओत पडळकर यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली आहे. त्यांनी आवाहन केले की, १ मे रोजी धनगर समाजाने आरक्षणाचा जागर करावा. झोपी गेलेल्या सरकारला जागं करावं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी चौंडीला जाऊन दर्शन घेणार आहे. हा जयंतीचा कार्यक्रम लाईव्ह दाखवणार आहे. कोरोनामुळे इतरांना चौंडीला येता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी घरीच राहून अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करावं. अहिल्यादेवींचं दर्शन घेऊन मी धनगर आरक्षणाचा विसर पडलेल्या सरकारला जागं करण्याचा निर्धार करणार आहे. कोव्हिड काळात एकत्र येणं शक्य नसल्याने समाज बांधवांनी सोशल मीडियाद्वारे एकत्रित येऊन या सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
पडळकर पुढे म्हणतात, धनगर आरक्षणासाठी आपण २०११ रोजी अखेरचा लढा दिला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारने ‘जे आदिवासींना ते धनगरांना’ असं मान्य करून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्यात धनगड नावाची जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत, असं प्रतिज्ञापत्रं फडणवीस सरकारने कोर्टात सादर केलं होतं. जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही. तोपर्यंत धनगर समाजासाठी एक हजार कोटीचं बजेट सरकारने मंजूर केलं होतं. पण महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकही योजना लागू केली नाही किंवा एक रुपयाही धनगर समाजाला दिला नाही. महाविकास आघाडीच्या गड्यांना आपल्याला हादरा द्यायचा आहे. म्हणून महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाची लाट असल्याने सोशल मीडियावरून या जागरमध्ये सामिल व्हा, असे आवाहन त्यांनी केले.