‘झुंज’ देणारी

    27-Mar-2021
Total Views | 162

NNN_1  H x W: 0
 
 
 
सहजसुंदर अभिनेत्री गोरा रंग, धारदार नाक, डोलदार बांधा, गालावरचा तीळ आणि नजरेतील वेधकता या वैशिष्ट्यांच्या जोरावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार्‍या अभिनेत्री म्हणजेच रंजना....
 
 
 
‘सुशिक्षित, संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी स्त्री’ अशा दोन टोकांमधील प्रवास साकारणारी ‘सुशीला’ या चित्रपटातील या अभिनेत्रीची भूमिका लक्षणीय होती. सज्जनतेपासून दुर्जनतेपर्यंतचा ‘सुशीला’ या व्यक्तिरेखेचा प्रवास, त्यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना हतबद्ध करणारा ठरला. या अभिनेत्रीच्या अभिनयाचा खरा कस लागला, तो ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील भूमिका साकारताना. कुलदीप पवार या अभिनेत्यासह त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती.
 
 
 
नववधू म्हणून नव्याने घरात आलेली, शेतकरी नवर्‍याबरोबरचे हलाखीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी गृहिणी, नवर्‍याच्या मृत्यूनंतरही मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई आणि वृद्ध झाल्यावर सुना आल्यावरही घराचे अभंगत्व टिकवण्यासाठी धडपडणारी सासू, असा वयपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच चित्रपटातून उलगडून दाखवणार्‍या या अभिनेत्रीला चित्रपटातील या विविधांगी भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही. पण, त्यांची विशेष रंजक भूमिका म्हणून आपल्याला ‘मुंबईच्या फौजदार’ या भूमिकेकडे पाहावे लागते.
 
 
त्यातील सुशिक्षित नवर्‍याची अशिक्षित पत्नी, निरागस स्वभावाची गावात राहिलेली मुलगी लग्नानंतर शहरात येते व तिथे नवर्‍यापासून शेजार्‍यांपर्यंत सर्वांच्या चेष्टेचा विषय होते. पण, त्याचेही वाईट वाटून न घेता नवर्‍याशी सुखाने संसार करण्याचे स्वप्न पाहते. नवर्‍याला मात्र नकोशी झाली आहे हे कळल्यावर ती आपणहून माहेरी निघून जाते. पण, त्यातही हार न मानता शहरी रीतीरिवाज शिकून पुन्हा नवर्‍याला सामोरी जाते आणि नवर्‍याचे मन जिंकते. पण, स्वत:चे निरागसपण हरवून बसते. ‘ग्रामीण-खेडवळ स्त्री ते शहरी, सुशिक्षित स्त्री’ यातला विरोधाभास ज्या ताकदीने या अभिनेत्री रंगवतात, तो विरोधाभास केवळ चित्रपट पाहण्यातूनच सहजपणे उमगत जाणारा आहे. गोरा रंग, धारदार नाक, डोलदार बांधा, गालावरचा तीळ आणि नजरेतील वेधकता, या वैशिष्ट्यांच्या जोरावर वैविध्यपूर्ण भूमिका साकार करत आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत रसिकांना आपलेसे करणार्‍या अभिनेत्री म्हणजेच रंजना.
 
 
 
रंजना यांचा जन्म २३ जुलै, १९५२ रोजी मुंबई येथे झाला. ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे रंजना. रंजना देशमुख हे त्यांचे पूर्ण नाव. घरात अभिनयाचा वारसा असणार्‍या रंजना यांचे वडील गोवर्धन हे गुजराती रंगमंचावरील ‘बालगंधर्व’ म्हणून ओळखले जात. आई वत्सला देशमुख यांनी वडिलांबरोबर घटस्फोट घेतल्यावर रंजना व तिचा लहान भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजे संध्याकडे राहू लागले. रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले. तसेच आई वत्सला देशमुख यांचा अभिनयाच्या क्षेत्रात कारकिर्द घडवण्याला विरोध असल्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच ‘दावर इन्स्टिट्यूट’मधून ‘सेक्रेटेरियल प्रॅक्टिस’, ‘ब्यूटी पार्लर’, ‘बँकिंग’, ‘केटरिंग’ अशा विविध पदव्या मिळवल्या. पण, त्याच बरोबरीने रुईया महाविद्यालयातून तत्त्वज्ञान व साहित्य या विषयातील पदवीही मिळवली.
 
 
खरेतर रंजना यांची अभिनय कारकिर्द बालवयातच सुरू झाली, ती ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटातून वयाच्या पाचव्या वर्षीच! त्यानंतर त्यांनी ‘लडकी सह्याद्री की’ या हिंदी व मराठी भाषांतील चित्रपटातही अभिनय केला होता.आई व मावशी यांच्यासोबत राहणार्‍या रंजना यांनी चित्रपटसृष्टीचा अनुभव जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ, अशी अपेक्षा मनात बाळगली नसताना त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती, व्ही. शांताराम यांच्यामुळे. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ (१९७५) या चित्रपटातील भूमिकेसाठी व्ही. शांताराम यांनी रंजना यांना विचारले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण प्रत्ययकारी भूमिकेमुळे त्यांना किरण शांताराम यांनी ‘झुंज’ (१९७७) या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. यातील त्यांची ग्रामीण शाळेतील शिक्षिकेची भूमिका त्यांनी सक्षमपणे साकारली. या भूमिकेतील त्यांची अभिनयकला लक्षात घेऊनच त्यांना पुढे अनेकानेक चित्रपट मिळाले.
 
 
यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा चित्रपट म्हणजे ‘असला नवरा नको गं बाई’ (१९७७). या चित्रपटात खेडवळ असणार्‍या राजा गोसावी यांच्याबरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणीची भूमिकाही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळेपणा देणारी भूमिका त्यांना ‘चानी’ या चित्रपटामुळे मिळाली. चि. त्र्यं. खानोलकर यांच्या ‘चानी’ या कादंबरीवर आधारित असणार्‍या या चित्रपटातील चानीची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत वठवली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणूनच तत्कालीन समाजाकडून नाकारली गेलेली स्त्री रंजना यांनी ताकदीने रंगवली. ‘मानसिक संघर्ष विरुद्ध सामाजिक संघर्ष’ मांडलेल्या या चित्रपटातील त्यांची भूमिका आशय व विषयदृष्ट्या पूर्णपणे वेगळी ठरली.
 
 
रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले असले, तरी त्यांची खरी जोडी जमली ती अशोक सराफ यांच्याबरोबरच. त्यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे ‘सुशीला’ (१९७८), ‘गोंधळात गोंधळ’ (१९८१), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३), ‘बहुरूपी’ (१९८४), ‘बिनकामाचा नवरा’ (१९८४), ‘खिचडी’ (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. किंबहुना, चित्रपटसृष्टीला ‘अशोक-रंजना’ या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली. पण, या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र रसिकांना लाभले नाही. ऐंशीच्या दशकातील मराठीतील ही आघाडीची अभिनेत्री. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनही रंजनाला ओळखले जाते. करिअर यशोशिखरावर असताना एक वळण असे आले की, तिचे संपूर्ण आयुष्याच बदलून गेले.
 
 
तिची जीवनकहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. अनेक नायिकाप्रधान चित्रपटात त्यांनी काम केले. पण, एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. व्ही. शांताराम यांच्या ‘झुंजार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळुरूला जात असताना दि. २२ नोव्हेंबर, १९८४ रोजी रंजना यांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचे निवृत्त व्हावे लागले. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. त्यांचा डावा हातही निकामी झाला.
 
 
 
हा अपघात घडला, त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील त्यांच्यासोबत गाडीत होते. पण, त्यांना काहीही झाले नाही. हा अपघात घडला, त्यावेळी रंजना या केवळ ३२ वर्षांच्या होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही ‘व्हीलचेअर’वर काढली. अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण, त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी ‘फक्त एकदाच’या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. ‘व्हीलचेअर’वर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो, असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खर्‍या आयुष्यावर आधारित होते, असे म्हटले जाते. या नाटकाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
 
 
ग्रामीण, सुशिक्षित, बंडखोर स्त्री साकारताना रंजना जेवढ्या समरस होत होत्या, तेवढ्याच त्या निरागस भाव व्यक्त करताना समरस व्हायच्या. इतकेच नाही, तर तमाशाच्या फडावर नाचतानाही त्या तितक्याच तल्लीन व्हायच्या. यातूनच अभिनयाकडे पाहण्याची त्यांची प्रगल्भ दृष्टी अधोरेखित होते. त्यांच्या अभिनयातील विविधांगी रूपे प्रेक्षकांना जशी आवडत होती, तशीच त्यांची अदाकारीही प्रेक्षकांना भावत होती. म्हणूनच आजही त्यांचे नाव चित्रपटसृष्टीत आदराने व मानाने घेतले जाते. ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, ‘चानी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. त्यांना ऐंशीच्या दशकातील सगळ्यात यशस्वी अभिनेत्री मानले जात असे. त्यांच्या अभिनयावर, सौंदर्यावर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले होते. २००० मध्ये परळ येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार्‍या अशा सहजसुंदर अभिनेत्रीला मनापासून सलाम....
 
- आशिष निनगुरकर
 
९०२२८७९९०४
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121