चाळीसगावात संबंधित उद्योजक व व्यापार्यांचे प्रांताधिकार्यांना निवेदन
चाळीसगाव :
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची घोषणा करताना प्लास्टिक व्यवसायाशी निगडीत व्यावसायिकांचा विचार केलेला नाही. राज्य शासनाचा हा निर्णय एकतर्फी असून त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची कुर्हाड कोसळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्लास्टिक बंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, अशा मागणीचे निवेदन येथील प्लास्टिक कॅरीबॅग, ग्लास, डिस्पोजेबल आयटम, युज अँड थ्रो मटेरिअल व्यापारी असोसिएशनतर्फे प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
या विषयाबाबत प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, नगरपालिकेचे मुख्याधिकरी अनिकेत मानोरकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
दीपक प्लास्टिक, आर्या प्लास्टिक, गायत्री प्लास्टिक, बाबूभाई प्लास्टिक, धनश्री प्लास्टिक, कोमल प्लास्टिक, मनुमाता प्लास्टिक, राजेंद्र येवले, आशापुरी प्लास्टिक, दत्तात्रय सोनजे, वैष्णवी प्लास्टिक आदींनी हे निवेदन दिले.
आत्महत्येची वेळ - २० वर्षांपासून आम्ही प्लास्टिक वस्तूंची विक्री करीत आहोत. मात्र, शासनाने एकतर्फी निर्णय घेऊन प्लास्टिक बंदी जाहीर केली. या निर्णयास आमच्या असोसिएशनचा विरोध आहे. या व्यवसायावर आमचा इतर कामगारांचा उदरनिर्वाह सुरू आहे. अनेकांनी बँकांकडून मोठे कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. परंतु, आता प्लास्टिक बंदी झाली तर अनेकांवर आत्महत्येची वेळ येईल. त्यामुळे राज्य शासनाने या निर्णयाबाबत फेरविचार करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.