लोकशाहीच्या मंदिराला तत्त्व, शिस्त आणि नियमांद्वारे नवी दिशा देणारा दीपस्तंभ!
10-Jul-2025
Total Views | 8
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा कफ परेड फेडरेशनतर्फे आयोजित कार्यक्रम येथे सत्कार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला नवी दिशा दिली. 2019 मध्ये भाजप-युतीकडे बहुमत असूनही विरोधी पक्षात बसावे लागले, त्या काळात ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुद्देसूद भूमिका घेत तत्कालीन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नंतरच्या राजकीय उलथापालथीत राज्यात भाजप-महायुती सरकार स्थापन झाले. त्या काळात निर्माण झालेल्या संविधानिक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी कायद्याची समज असलेली व्यक्ती विधानसभा अध्यक्षपदी असणे आवश्यक होते, म्हणूनच त्यांची निवड झाली. एक वर्षभर त्यांनी संविधानिक प्रश्नांवर सुनावण्या घेऊन निर्णय दिले आणि तो निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला. त्यामुळे ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाची निवड सार्थ ठरली.
देशपातळीवरही ॲड. राहुल नार्वेकर यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून लोकसभा अध्यक्षांनी त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट विधानसभा अध्यक्ष म्हणून गौरवले. त्यांनी सभागृहात अधिकाधिक काम होण्यासाठी प्रयत्न केले, नवीन आमदारांना बोलण्याची संधी दिली आणि महाराष्ट्राचे विधानसभा सभागृह देशातील सर्वाधिक कार्यक्षम ठरले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी विधानसभेचे कामकाज पेपरलेस केले. कुलाबा व कफ परेड परिसराचा 'स्टेट कॅपिटल रिजन' म्हणून विकास व्हावा, अशी संकल्पना त्यांनी मांडली.
मुंबईत पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होत असून आयटी आणि स्टार्टअप कंपन्यांचे रिव्हर्स मायग्रेशन सुरु झाले आहे. स्टार्टअप इंडियाच्या अहवालानुसार महाराष्ट्र देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे. मुंबई-एमएमआर प्रदेश टेक हब म्हणून विकसित होत असून देशातील 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी येथे आहे. तिसरी मुंबई, कोस्टल रोडचा विस्तार, मेट्रो प्रकल्प, आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणा यामुळे वाहतुकीसंदर्भात मोठा बदल दिसून येईल.
धारावी झोपडपट्टी पुनर्विकासामुळे 10 लाख लोकांना घरे मिळणार असून आगामी 10 वर्षांत मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. वाढवण येथे उभारल्या जाणाऱ्या भव्य बंदरामुळे ‘चौथी मुंबई’ उदयास येईल. 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे आणि 2047 पर्यंत केवळ एमएमआर प्रदेशाची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. अशा महत्त्वाकांक्षी दृष्टीकोनात ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासारखी दूरदृष्टी असलेली व्यक्ती विधानसभा अध्यक्षपदी आहे, याचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी आ. रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.