नवी दिल्ली, प्रयागराज महाकुंभप्रमाणेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थाची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली.
सिंहस्थसाठी रेल्वे विभाग व्यापक पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल अपग्रेडेशन हाती घेईल. संपूर्ण प्रदेशातील स्थानकांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी एकात्मिक योजना तयार केली आहे. नाशिक सिंहस्थ २०२७ दरम्यान प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी, हे याचे उद्दिष्ट आहे. रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महाकुंभ २०२५च्या अनुभवातून समोर आलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. नाशिकच्या जवळच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याची सूचना रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सुरळीत वाहतुकीसाठी पुरेशा स्टेबलिंग क्षमतेची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मेळा परिसराच्या क्षेत्रातील ५ महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे या स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी निवडलेल्या पाच स्थानकांवरील प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे आणि प्रवासी सुविधांची माहिती दिली. या स्थानकांवरील नियोजित कामांसाठी १,०११ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, प्रवासी सुविधा वाढवणे:फलाटांचा विस्तार आणि सर्व ५ स्थानकांवर विविध प्रवासी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये फलाटांवर छत कव्हर, पाण्याच्या टाक्या, नवीन शौचालये आणि वॉटरप्रूफ होल्डिंग एरिया यांचा समावेश आहे. सर्क्युलेटिंग एरिया, मार्ग, प्रवेश/निर्गमन रस्ते आणि प्रवासी माहिती प्रणाली देखील अद्ययावत करण्याचे नियोजन आहे. ही कामे २ वर्षांच्या कालावधीत योग्य प्रकारे पूर्ण करण्यात येतील. प्रस्तावित ६५ कामांपैकी ३३ कामांना आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
सिंहस्थसाठी विशेष गाड्यासिंहस्थासाठी ३ कोटींहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे, जी २०१५च्या सिंहस्थाच्या तुलनेत सुमारे ५० पट अधिक आहे. हे लक्षात घेऊन, रेल्वे विभाग विशेष गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्याची योजना आखत आहे. भारतभरातून नाशिककडे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी लांब पल्ल्याच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू सेवा दिल्या जातील. एक राउंड-ट्रिप विशेष सर्किट ट्रेन देखील चालवली जाणार आहे. ही गाडी 3 ज्योतिर्लिंगांना - त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर यांना जोडेल.