पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात ख्रिश्चन मिशनर्यांकडून तक्रार दाखल
24-Oct-2023
Total Views | 380
चंदीगढ : बागेश्वर धाम पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी पंजाबमधील पठाणकोटमध्ये आयोजित त्यांच्या कार्यक्रमात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी लोकांना धर्मांतराच्या षडयंत्राविरोधात जागृती करण्याचे आवाहन केले. परकीय शक्तींनी मंदिरे आणि गुरुद्वारांमध्ये प्रवेश करणे थांबवावे, असे ते म्हणाले. त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या मिशनऱ्यांना बजावले की त्यांनी निरपराध हिंदूंची दिशाभूल करणे थांबवावे. भारत हा बाबरचा नसून रघुवरांचा देश आहे, असे सांगून धीरेंद्र शास्त्री यांनी सरकारला धर्मांतराविरोधातील कायदा अधिक कठोर करण्याचे आवाहन केले आहे.
भारतात होत असलेल्या धर्मांतरामागे विदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप धीरेंद्र शास्त्री यांनी केला. पंजाब ही गुरू आणि वीरांची भूमी असल्याचे वर्णन करताना बागेश्वर धामचे पीठाधीश्वर म्हणाले की, तेथे जाणे हे आपले भाग्य आहे. पंजाबमधील लोक प्रेमळ आणि मोठ्या मनाचे असल्याचे सांगून धीरेंद्र शास्त्री यांनी लोकांना गुरु नानकांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले आहे की, तो 'हलीउल्लाह' लोकांना पंजाबमध्ये राहू देऊ इच्छित नाही. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ख्रिश्चन मिशनर्यांकडून होत असलेले धर्मांतर हे सनातनला नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. बागेश्वर धाम पीठाधीश्वर यांच्या या वक्तव्यावर पंजाबमधील ख्रिश्चन संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय ख्रिश्चन कमिटीने पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अजनाळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांचे म्हणणे आहे की पंडित शास्त्रींनी त्यांच्या 'हलेलुजा'ला 'हलेलुल्ला' म्हटले आहे ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तक्रारीत पंडित शास्त्री यांचे वक्तव्य ख्रिश्चनांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच २ दिवसांची मुदत देत धीरेंद्र शास्त्री यांना माफी मागून त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. २ दिवसांनी बागेश्वर धाम पीठाधीश्वर विरोधात मोठे आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.