नवी दिल्ली : राज्यसभेत उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवरून सुरू असलेल्या राजकारणाला खासदार उदयनराजे यांनी पूर्णविराम दिला आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा दिला असता, केवळ छत्रपतींच्या नावे राजकारण करणाऱ्यांचा हा डाव आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांनी समाचार घेतला आहे.
उदयनराजे म्हणाले, "माझ्या शपथविधीवेळी स्वतः पवार साहेब तिथे उपस्थित होते राऊतांनी त्यांना विचारावे, तसेच ज्या दोन काँग्रेस खासदारांनी माझ्या घोषणेवर आक्षेप घेतला त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीने जाब विचारावा. राज्यात सत्तेत सोबत आहेत. त्यामुळे जी गोष्ट घडली नाही त्याचे राजकारण करू नये", असे आवाहन खासदार उदयनराजे यांनी केले आहे. तसेच संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केवळ राजकारण करण्यासाठी महाराजांचे नाव घेत असल्याची टीका त्यांनी केली.
महाराज मोठे की बाळासाहेब ?
"हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महान नेते होते आहेत आणि राहतील त्यांच्याबद्दल आदर कायम राहिल. परंतू, ते छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहेत का ? जी शिवसेना शिवरायांचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोहोचली. त्यांनी महाराजांबद्दल आदर का दाखवला नाही. शिवसेना भवनावर आधी बाळासाहेब आणि नंतर शिवछत्रपतींचा पुतळा असा क्रम का आहे, याचे उत्तर राऊतांनी द्यावे. मी शिवजींचा वंशज आहे की नाही हे मला विचारणारे आता मलाच याबद्दल बोलायला सांगत आहेत का ? राऊत महान व्यक्तीमत्व आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचा समाचार घेतला.
ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचा राजीनामा मागा !
उदयनराजेंनी शपथ घेतल्यानंतर काँग्रेस खासदार मल्लिकार्जून खर्गे आणि गुलाम नबी आझाद यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणेला आक्षेप घेतला. यानंतर उपराष्ट्रपतींनी सभागृह अध्यक्ष म्हणून यात हस्तक्षेप केला. यामुळे उदयनराजेंचा राजीनामा मागणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिले आहे. त्या दोन खासदारांचा राजीनामा त्यांच्या पक्षातील लोकांनी मागावा, असा पलटवारही त्यांनी केला.