रिलीफ फंडात देणगी देणाऱ्या नागरिकांनाच सवलती
मुंबई (प्रतिनिधी) - पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजलेला असताना देखील पंतप्रधान इम्रान खान यांनी संपूर्ण लाॅकडाऊन घोषित करण्यास नकार दिला आहे. संपू्र्ण लाॅकडाऊन जाहीर झाल्यास देशात अशांतता निर्माण होईल. तसेच आम्ही देशातील सर्व जनतेला अन्न पुरवू शकत नाही. त्यामुळे जनतेवर लाॅकडाऊनही लादू शकणार नाही, असे खान यांनी सोमवारी रात्री पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना म्हटले.
पाकिस्तानात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बिधातांची संख्या १,७२७ वर पोहोचली आहे. या परिस्थितीत पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी रात्री देशाला तिसऱ्यांदा संबोधित केले. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानमध्ये संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर करु शकत नाही. असे केल्यास देशात अशांतता पसरेल. आम्ही चीनसारखे असलो तर नक्कीच देश बंद केला असता. परंतु, आमचे २५ टक्के लोक दारिद्यरेषेखालील आहेत. लाॅकडाऊन जाहीर केल्याास ८० मिलियन गरीब लोकांना त्याच्या फटका बसेल. यावेळी खान यांनी कोरोना रिलीफ टायगर फोर्सची स्थापना करत असल्याचे घोषित केले. ही फोर्स सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसोबत काम करेल. तसेच आम्हाला लाॅकडाऊन जाहीर करणे भाग पडल्यास ही फोर्स लोकांना अन्न पुरवेल, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे बुधवार पासून खान पाकिस्तानमध्ये कोरोना रिलीफ फंडाची सुरुवात करणार आहेत. मात्र, या फंडामध्ये जे लोक देणग्या देतील त्यांनाच सवलती मिळणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद अफझल म्हणाले की, देशात कोरोनाच्या चाचणीची क्षमता वाढविण्यासाठी नवीन लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी वैद्यकीय उपकरणे चीनमधून आयात केली जातील. त्यासाठी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये काही विमाने चीनला जाऊन तिथून आवश्यक वस्तू घेऊन येणार असल्याचे अफजल यांनी सांगितले.