मुंबई : जितेंद्र आव्हाडांनी पक्षासाठी काय केले? तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले. असा पलटवार अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिला आहे. "शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंबच नाही रक्त आटवून पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार केला. 2004 मध्ये तोंडातून रक्त वाहत असताना शरद पवार प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडलेले असतानाही त्यांनी पक्षाचे काम थांबवले नाही. याला म्हणतात पक्षासाठी जीव आणि प्राण देणे. अजित पवारांनी आजपर्यंत एकदाही पक्षाचे पद भुषवले नाही. त्यामुळे पक्ष वाढवण्यात आणि एका पोराला मोठं करण्यात बापाचे योगदान असते, ते शरद पवारांनी पक्षासाठी केले आहे." असं आव्हाड म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाडांना प्रत्त्युत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले, "अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. यातुन तुम्हाला राज्यात काम करण्याची संधी दिली. महाविकास आघाडीच्या काळात गृहनिर्माणसारखे महत्त्वाचे खाते दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष, ठाणे शहराध्यक्ष आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस ही पदं देऊन संघटना बळकट करण्याची संधी दिली. मात्र तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले. आव्हाडांच्या वक्तव्याशी सुप्रिया सुळे सहमत आहेत का?” असाही सवाल चव्हाण यांनी केला आहे.