मुंबई: राज्य शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आता महत्त्वाच्या वळणावर आली आहे. योजनेच्या पारदर्शकतेसाठी शासनाकडून करण्यात आलेल्या ई-केवायसी पडताळणीनंतर राज्यातील सुमारे ८० लाख महिला अर्जदार अपात्र ठरल्या आहेत. यानंतर पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आगामी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार का? या प्रश्नाचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana)
रक्षाबंधनाला सरकारकडून 'खास भेट'?
येत्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांना विशेष भेट देण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचा हप्ता एकत्र करून ३००० रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाऊ शकतात, अशी माहिती सध्या माध्यमांतून समोर येत आहे. यामुळे सणाच्या काळात राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो. (Ladki Bahin Yojana)
ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांनाच मिळणार लाभ
या योजनेअंतर्गत कोणतीही फसवणूक होऊ नये आणि निधी थेट पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. ई-केवायसीनंतर पात्र ठरलेल्या महिलांच्याच बँक खात्यात ही रक्कम थेट 'डीबीटी' द्वारे जमा केली जाईल. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांची बँक खाती आधारशी जोडलेली आहेत, त्यांनाच या विशेष योजनेचा फायदा होणार आहे. (Ladki Bahin Yojana)