लखनऊ (Jayant Chaudhary ABCD) : उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरणात समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अखिलेश यादव यांनी ‘राजकारणाची ABCD आम्ही शिकवली’ अशी टिप्पणी केल्यानंतर जयंत चौधरी यांनी त्यांच्यावर नाव न घेता जोरदार पलटवार केला आहे. लखनऊमध्ये आयोजित RLDच्या कार्यक्रमात जयंत चौधरी यांनी ‘ABCD’चा वेगळाच अर्थ सांगत विरोधकांवर निशाणा साधला.
जयंत चौधरी यांनी म्हटले की, काही लोक प्रत्येक वाद आणि घटनेकडे राजकीय चष्म्यातून पाहतात आणि त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. याच संदर्भात त्यांनी ‘A =अहंकार, B = भ्रष्टाचार, C = चोरी आणि D = धोखाधडी’ अशी ABCD सांगत अखिलेश यादव यांच्या भूमिकेवर टीका केली. (Jayant Chaudhary ABCD)
‘चौधरी चरण सिंह यांनी आम्हाला वेगळी ABCD शिकवली’
जयंत चौधरी यांनी आपल्या वक्तव्यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या राजकीय विचारांचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, चौधरी चरण सिंह यांनी त्यांना समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे, लोकांच्या भावनांची कदर करणे, चारित्र्याचे महत्त्व समजून घेणे आणि संयम राखणे शिकवले. (Jayant Chaudhary ABCD)
जयंत चौधरी यांच्या मते, चौधरी चरण सिंह यांची राजकीय विचारधारा जातीय राजकारणाच्या पलीकडे जाणारी होती. समाजातील दुर्बल घटकांना पुढे आणणे आणि सर्व वर्गांना सोबत घेऊन जाणे हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.
‘व्यूज आणि चर्चेसाठी काहीही बोलले जाते’
जयंत चौधरी यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीच्या राजकारणावरही निशाणा साधला. काही लोक केवळ चर्चा आणि ‘व्यूज’ मिळवण्यासाठी योग्य-अयोग्य याचा विचार न करता वक्तव्ये करतात, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, राजकीय मतभेद असले तरी संवेदनशील मुद्द्यांकडे जबाबदारीने पाहणे आवश्यक आहे. (Jayant Chaudhary ABCD)
‘चवन्नी’च्या वक्तव्यापासून वादाची सुरुवात
अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमातील वक्तव्यामुळे या वादाला सुरुवात झाली. त्यांनी गठबंधनातील काही नेत्यांवर निशाणा साधताना ‘चवन्नी को रुपया बना दिया’ असा टोला लगावला होता. त्याचवेळी काही नेत्यांना राजकारणाची ABCD आपण शिकवल्याचेही त्यांनी म्हटले होते. (Jayant Chaudhary ABCD)
या वक्तव्यावर जयंत चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आपल्यावर टीका करायची असेल तर थेट नाव घेऊन करावी; मात्र त्यासाठी जाट समाजाला या वादात ओढणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते.
२०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे तापली
उत्तर प्रदेशात २०२७च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना सपा आणि RLDमधील हा संघर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट मतदार, चौधरी चरण सिंह यांचा राजकीय वारसा आणि विविध सामाजिक समीकरणे यामुळे दोन्ही पक्षांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे.
जयंत चौधरी यांच्या वक्तव्यामुळे ‘ABCD’च्या माध्यमातून सुरू झालेला हा राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे. एका बाजूला अखिलेश यादव आपल्या राजकीय प्रभावाचा उल्लेख करत आहेत, तर दुसरीकडे जयंत चौधरी, चौधरी चरण सिंह यांच्या विचारांचा आणि सर्वसमावेशक राजकारणाचा दाखला देत आपली भूमिका मांडत आहेत. (Jayant Chaudhary ABCD)