वर्धा येथील जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३,०११.२० कोटी रुपयांचे प्रस्तावित ५३ करार

    30-Aug-2026

मुंबई (अभिनंदन परुळेकर) :
(Wardha Investment Conference) जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा यांच्यावतीने आशीर्वाद सेलिब्रेशन हॉलमध्ये वर्धा जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३,०११.२० कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक असणारे ५३ करार झाले. या करारांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात रोजगार निर्मिती होणार असून, वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला व स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना मंत्री उदय सामंत म्हणाले की,"महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारधारेने पावन झालेल्या, स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक वर्धा भूमीत या परिषदेत महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोलाची भर पडली आहे. या परिषद झालेल्या करारांमधील आकडेवारी केवळ कागदावरची नाही, तर वर्ध्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधींचं हे एक दालन उघडलं गेलं आहे. या गुंतवणुकीमुळे केवळ प्रत्यक्षच नव्हे, तर अप्रत्यक्ष स्वरूपातही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. वर्ध्याचा तरुण आता नोकरी मागणारा नाही, तर नोकऱ्या देणारा आणि उद्योजक होईल." (Wardha Investment Conference)

या परिषदेला राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री व वर्ध्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल, उद्योग विभागाचे सहआयुक्त शिवकुमार मुद्दावार, लघु उद्योग भारतीचे महामंत्री हरीष हांडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण हिवरे, परिविक्षाधीन शोभीता पाठक आदींसह उद्योजक व उद्योग समूहांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. (Wardha Investment Conference)








संबंधित मजकूर