मुंबई (Book Village Navegaon Bandh) : मराठी भाषा संवर्धन आणि समृद्ध वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित 'पुस्तकांचे गाव - नवेगाव बांध' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
" आजचे युग हे डिजिटल युग आहे, स्मार्टफोन्सचे युग आहे. अशा काळात नवी पिढी पुस्तकांपासून दुरावत चालली आहे का, अशी चिंता नेहमी व्यक्त केली जाते. पण अशा वेळी गावागावांत पुस्तकांचे दालन उभे करून घराघरांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा हा जो प्रयत्न राज्य मराठी विकास संस्था आणि नवेगाव बांध फाउंडेशनच्या माध्यमातून झाला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आहे." असे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी केले. (Book Village Navegaon Bandh)
याप्रसंगी पद्मश्री परशुराम खुने, माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले, श्री. अविनाश ब्राह्मणकर, जिल्हाधिकारी श्री. मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल दोन्तुला, पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे, सरपंच सौ. हिराताई पंधरे, समन्वयक श्री. रामदास बोरकर, ग्रा.पं. अधिकारी श्री. एच. पी. गजभिये, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीनजी पुगलिया यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Book Village Navegaon Bandh)