मुंबई (Jalyukt Shivar 3.0) : महाराष्ट्रातील मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा जलयुक्त शिवार अभियान ३.० मध्ये प्राधान्याने समावेश करून, या गावांमध्ये जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण व्यवस्थापनाबाबत बैठक झाली. यावेळी राज्यातील जलसंधारणाची कामे, जलस्रोतांचे बळकटीकरण तसेच विविध विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. (Jalyukt Shivar 3.0)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील सूक्ष्म पाणलोट क्षेत्रांचा विकास आणि जलस्रोतांचे बळकटीकरण याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ज्या प्रकल्पांची कामे निश्चित करण्यात आली आहेत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामांना प्राधान्याने गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. त्यामुळे जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारकपणे आणि थेट पद्धतीने पूर्ण करता येतील. (Jalyukt Shivar 3.0)
मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला, अशा गावांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांना जलयुक्त शिवार अभियान ३.० मध्ये प्राधान्य द्यावे. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेला सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. (Jalyukt Shivar 3.0)
यावेळी मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे यांनी मृद व जलसंधारण व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Jalyukt Shivar 3.0)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.