विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरे बंधूंचे राजकारण,आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी उद्धव, राज ठाकरेंचा मोर्चा - भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी फटकारले
मुंबई (Navnath Ban on Thackeray Protest) : "उबाठा गट आणि मनसेच्या वतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात कुठलाही झेंडा नसेल, असे दोन्ही पक्षनेत्यांनी सांगितले असले, तरीही आदित्य आणि अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य पक्के करणे एवढाच या मोर्चाचा अजेंडा आहे. दिल्लीत राहुल गांधींच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आंदोलन करते आहे. अगदी त्याचपद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे आदित्य आणि राज ठाकरे हे अमित ठाकरेंचे भवितव्य पक्के करण्यासाठी या आंदोलनाचा उपयोग करत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कितीही आंदोलन केले तरी त्याचा जनतेवर अजिबात परिणाम होणार नाही." असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.२४ रोजी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
LIVE ! पत्रकार परिषद - मा. नवनाथजी बन ( मुख्य प्रवक्ता ) - 24 जुलै 2026 - भाजपा कार्यालय, मुंबई ! https://t.co/Sfe7xvQGGr
"आंदोलकांशी सातत्याने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. सोनम वांगचुक यांनीही काल उपोषण मागे घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्टपणे सांगितले की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत आणि पेपरफुटी प्रकरणात कठोर कायदा करण्याची तयारीही सरकारने केली आहे. असे असताना या देशात अराजकता पसरवण्याचे काम काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. देशातील जनता, तरुणाई - विद्यार्थी याला बळी पडणार नाहीत."असे बन यांनी सुनावले.
" सरकार चर्चेसाठी तयार असताना अडेलट्टूपणाची भूमिका घेणाऱ्या संजय राऊतांना आव्हान आहे की त्यांनी भांडुपच्या गाढव नाक्यावर बसून किमान दोन दिवसांचे तरी कडकडीत उपोषण करत विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. हे कोरडे उमाळे थांबवा. घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही."असा चिमटाही. बन यांनी काढला.
" विरोधकांना, काँग्रेसलाही चर्चा होऊ द्यायची नाही. केवळ पळपुटेपणा करायचाय. संसदेतल्या अधिवेशनात तीन दिवस रोज उठून गदारोळ करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेस सातत्याने चर्चेपासून पळ काढते आहे. कारण बांगलादेश, नेपाळप्रमाणे भारतात राजकीय अस्थिरता निर्माण करायची, जाळपोळ करण्याचे षडयंत्र रचायचे हाच त्यांचा अजेंडा आहे."असेही बन म्हणाले.