ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन यात्रेची इच्छापूर्ती होते याचा मनस्वी आनंद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेचा शुभारंभ

DevendraFadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचे प्रेरणास्त्रोत म्हणून आपण बोधगया येथे जातो. एकदा तरी तेथे जाऊन दर्शन घेण्याची ओढ भाविकांमध्ये असते. ज्येष्ठ नागरिकांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. नागपूर येथून या योजनेअंतर्गत यावर्षी सुमारे 800 भाविकांना जाता येत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
नागपूर रेल्वे स्थानक येथून बोधगयेकडे जाणाऱ्या भाविकांच्या पहिल्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, महापौर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय मेश्राम, समीर मेघे, चरणसिंह ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Devendra Fadnavis)
 
अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या श्रद्धेच्या तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेण्याची तीव्र इच्छा असते. आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होणे अशक्यप्राय होऊन जाते. अशा गरजू ज्येष्ठ नागरिकांना आपल्या तीर्थस्थळाच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी, या दृष्टीने शासनाने ही योजना आकारास आणली. आज या योजनेअंतर्गत असंख्य भाविकांना त्याचा लाभ होत आहे. सामाजिक न्याय विभागाने अतिशय उत्तमरित्या ही योजना राबविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागाचे कौतुक केले. (Devendra Fadnavis)
 
भाविकांच्या इच्छापूर्तीचा आनंद हा या योजनेची खरी यशस्वीता आहे. या यात्रेत कोणत्याही वृद्ध भाविकांची गैरसोय होऊ नये,या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाने काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आपण लवकरच बोधगया येथे महाराष्ट्रातील भाविकांसाठी व्यापक संकूल निर्माण करीत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देऊन भाविकांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते बोधगया येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. (Devendra Fadnavis)
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर