‘कुंडलिनी’ जागृत कशी करावी?
‘कुंडलिनी’ जागृत करण्याचे अनेक मार्ग आहेत. भक्तिमार्गामध्ये आत्यंतिक भावना वेगामुळे ‘कुंडलिनी’ आपोआप जागृत होते. परंतु, भक्त साधकाला याची काहीच जाणीव नसते. याचे मुख्य कारण म्हणजे भक्त आपले सर्वस्व, म्हणजेच सुख-दुःख, मानापमान आणि शरीरभावसुद्धा ईश्वराला समर्पण करतो. परंतु, काही भक्त मात्र ‘कुंडलिनी’ जागृतीचा अनुभव घेतात. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ‘कुंडलिनी’ जागृतीसंबंधी बराच ऊहापोह केलेला आहे. एवढी माहिती जगातील इतर कोणत्याही ग्रंथात मिळणार नाही.
आसने : नित्य योगासने करण्यामुळे साधकाची शरीरशुद्धी होऊन काही काळानंतर ‘कुंडलिनी’ आपोआप जागृत होऊ शकते. परंतु, काही आसने अशी आहेत की, जी विशेषतः ‘कुंडलिनी’ जागृतीसाठीच अवलंबिता येतात. पद्मासन, महामुद्रा आणि सिद्धासन ही होत. शरीरशुद्धीसाठी पवनमुक्तासन, गोमुखासन, अर्धमत्स्येंद्रासन, योगमुद्रा, सर्वांगासन, मत्स्यासन ही सहा आसने रोज केल्यास पुरेसे आहे. आसने, प्राणायाम, षट्चक्र भेदन (ध्यान), योगनिद्रा इत्यादी साधना ‘वैदिक विश्व’ संस्थेमध्ये नि:शुल्कपणे शिकविल्या जातात. युट्यूबवर Vaidik Vishwa Channel वरदेखील सर्व साधना नि:शुल्क उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आवर्जून कराव्यात.
खर्ज साधना : गायक ही खर्जसाधना करू शकतात. दररोज प्रात:कालिन शौच्यमुखमार्जनादी आटोपून खालचा निम्न स्वर साधून त्याच स्वरात आवाज स्थिर करावा. याला ‘खर्ज साधना’ म्हणतात. साधनेच्या वेळी खर्ज स्वराबरोबरच ‘गंधार’ व ’पंचम’ हे स्वरसुद्धा ऐकू येतात. स्वरसाधकाने तेही लक्षपूर्वक ऐकावे. आपणच खर्ज स्वर लावून स्वतःच श्रवण करावे. अशाप्रकारे ‘खर्ज साधना’ केल्याने ‘कुंडलिनी’ जागृत होऊन इतर सहा स्वरांची स्थानेही मुक्त होतात आणि गायक साधक चांगला गानयोगी बनून त्याला भगवान शिवाचा साक्षात्कार होतो. ज्याला चांगले गायक व्हावयाचे असेल, त्याने प्रथम ‘खर्ज साधना’ करावी. यासोबत ‘शिवस्वरोदय शास्त्रा’चा अभ्यास केल्यास घटना प्राप्ती होऊ शकते.
ध्यान : ध्यानाचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. काहीजण त्राटक करून आपले ध्यान केंद्रित करू पाहतील, तर काही केवळ मनाची एकाग्रता साधून करतील. केवळ मनाने ध्यानधारणा करणारे नेत्र मिटवून किंवा अर्धोन्मिलित ठेवून एखाद्या विशिष्ट ठिकाणी मन केंद्रित करून ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. पण, हा मार्ग कठीण आहे, म्हणून काही साधक आपली दृष्टी आपल्याच भ्रूमध्यावर किंवा नासिकाग्रावर केंद्रित करून ध्यान लावतात. हा प्रकारसुद्धा कठीणच आहे. म्हणून काही साधक या ‘नेत्र त्राटका’सोबत आपल्या श्वासोच्छवासाबरोबर ध्यान केंद्रित करतात आणि श्वासाबरोबर ‘सोऽहं’ चा आणि उच्छवासाबरोबर ‘हंसोऽ’ चा मनातल्या मनात उच्चार करतात आणि सतत याची आवृत्ती करतात. काही साधक भिंतीवर एक लहानसा डाग पाडून त्यावर दृष्टीने त्राटक करतात आणि काही साधक या त्राटकाच्या वेळी काही मंत्रसुद्धा जपतात. वंगदेशाचे सुप्रसिद्ध संत गौरांग महाप्रभू मयूरपंखाच्या नीजबदामी आकृतीवर आपले ध्यान आणि नेत्र केंद्रित करून भगवान कृष्णाजवळ पोहोचत असत. काहीजण दीपकाच्या ज्योतीवर ध्यान आणि नेत्र त्राटक करून ध्यानावस्थेत जाण्याचा प्रयत्न करतात. उदबत्तीच्या टोकावर नेत्र स्थिर करूनसुद्धा ध्यानसाधना करता येते.
ध्यानाची व्याख्या आहे, ‘सर्व शरीरेषु चैतन्यैकाग्रताध्यानम्’ शरीराच्या अणुरेणूंमध्ये जी चैतन्यशक्ती आहे तिला एकवटून एका विषयावर केंद्रित करणे म्हणजेच ‘ध्यान’ होय. पण, हे सांगायला जेवढे सोपे तेवढेच करायला कठीण आहे. योग्य अभ्यास आणि तद्नुकूल व्यवहार यामुळे ध्यानावस्था साध्य करता येते. ध्यानावस्था साध्य झाल्यास सर्व शरीरस्थित चैतन्य आपोआप आपली नियत अणूरचना बदलते आणि हीच कुंडलिनी जागृती होय. म्हणून ध्यानावस्थेमुळे ‘कुंडलिनी’ आपोआप बदलते. हा ‘कुंडलिनी’ जागृतीचा प्रकार कष्टदायक नसून सुखकारक व सुलभ आहे. लेखकाच्या स्वानुभवानुसार नेत्रध्यानसुद्धा ध्यानाचा एक परिणामकारक व सुलभ मार्ग आहे. डोळे मिटून आपल्या इष्ट देवतेचे किंवा एखाद्या डोळ्याचे ध्यान करावे. प्रथम डोळ्यातील बुबुळाचे ध्यान करावे, हे साध्य झाल्यास दोन्हीही डोळ्यांचे ध्यान करावे. प्रथम हे जरा कठीण वाटेल. कारण, डोळ्यांची बुबुळे ध्यानात येणार नाहीत. परंतु, जेव्हा येतील, तेव्हा साधक गहन ध्यानात पोहोचलेला असेल व परत देहभानावर यावयास वेळ लागेल. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत याचे वर्णन करतात ‘यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम’ जी अंतिम आराध्य अवस्था आहे ती साधकापाशी आणणाच्या प्रक्रियेला ध्यान म्हणतात. ‘ध्य’ + ‘आन’ (आणणे) म्हणजे ‘ध्यान’ होय. वैदिक परंपरेमध्ये ध्यानाला अतिशय महत्त्व आहे.
योगनिद्रा : योगनिद्रेमुळेसुद्धा शरीरातील घटाघटांची अणुरचना साधनानुकूल होऊन कुंडलिनी, तर आपोआप जागृत होतेच, पण त्याशिवाय अनेक अन्य लाभ होतात. योगनिद्रेमुळे साधकाचे शरीर प्रकृतीशी निगडित होते. म्हणजेच निरोगी बनते. शरीर निरोगी झाल्याने ‘कुंडलिनी’ची जागृती सुकर होते. अनेक दुर्धर व्याधी, उदा- मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश, अतिनिद्रा, थकवा येणे, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता, बुद्धीशी संबंधित मूढता, विस्मरण, क्रोध, चिडचिड आदी शारीरिक व्याधी बर्या होतात. योगनिद्रेला काहीजण ‘शवासन’ म्हणतात. परंतु, ‘शवासन’ अशी उच्च अवस्था आहे की, ज्यामध्ये साधक आपल्या शरीरातून सूक्ष्म शरीराने बाहेर निघून वाटेल, तिथे भ्रमण करू शकतो. (क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)