करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना; ३ महिन्यांत कामांना सुरुवात

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य – आमदार महेश बालदी

    07-Sep-2026
Uran Port
 
पनवेल: (Karanja Port) उरण विधानसभा मतदारसंघातील करंजा परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, करंजा बंदर आणि परिसरातील विविध विकासकामांसाठी १८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि अंमलबजावणी याबाबत करंजा सोसायटी येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी मत्स्यपालन विभागाचे अधिकारी, करंजा सोसायटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव उपस्थित होते.
 
करंजा हा परिसर प्रामुख्याने मच्छीमारी व्यवसायाशी जोडलेला असल्याने येथील मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन गरजा, व्यवसायाशी संबंधित अडचणी, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता मच्छीमार बांधवांच्या व्यवसायाला आणि दैनंदिन जीवनाला अधिक सुविधा मिळाव्यात, या दृष्टिकोनातून कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. बैठकीदरम्यान उपस्थित मच्छीमार बांधव आणि करंजा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील विविध समस्या, मागण्या आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. (Karanja Port)
 
३ महिन्यांत प्रत्यक्ष कामांना सुरुवात
 
१८० कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित विकासकामांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत असून, पुढील तीन महिन्यांत या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्यामुळे करंजा परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (Karanja Port)
 
मच्छीमारांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य
 
“करंजा परिसरातील मच्छीमार बांधव हे आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि स्थानिक विकासाचा महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अडचणी दूर करून त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे आमदार महेश बालदी म्हणाले. “मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणचा सर्वांगीण विकास हेच आमचे प्राधान्य आहे. करंजा परिसराच्या विकासासाठी १८० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेतली जात आहेत. या माध्यमातून करंजा परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि स्थानिक नागरिकांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडेल.” (Karanja Port)
 
या बैठकीमुळे करंजा परिसरातील मच्छीमार बांधवांच्या विविध प्रश्नांना योग्य दिशा मिळण्याबरोबरच आगामी विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून करंजा परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस जयविंद्र कोळी, नारायण नाखवा, राजेश नाखवा, भारत नाखवा, सागर नाखवा, शिवदास कोळी यांच्यासह पदाधिकारी, मच्छीमार बांधव, मत्स्यपालन विभागाचे अधिकारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते. (Karanja Port)
 
 
 




संबंधित मजकूर