मुंबई (Tirunelveli Ganesha controversy) : तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे बिर्याणी दुकानाच्या जाहिरातीवर भगवान गणेश यांना बिर्याणी खाताना दाखवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या चित्रामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दुकानाचा मालक जयंथ (३०) याला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंगनल्लूर येथील सेल्वराज यांनी तक्रार दाखल केली होती. दुकानाबाहेर लावलेल्या बॅनरमध्ये भगवान गणेश यांचे चित्र वापरण्यात आले असून, त्यामध्ये त्यांना बिर्याणी खाताना दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.(Tirunelveli Ganesha controversy)
तक्रारीत हे चित्र भगवान गणेश यांचा अवमान करणारे असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी बॅनरची पाहणी करून संबंधित माहिती गोळा केली. त्यानंतर दुकानाचा मालक जयंथ याच्याविरोधात कारवाई करत रविवारी त्याला अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Tirunelveli Ganesha controversy)
हा बॅनर नेमका कोणी तयार केला, तो दुकानाबाहेर कधी लावण्यात आला आणि भगवान गणेश यांचे चित्र कोणत्या उद्देशाने वापरण्यात आले, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. याशिवाय प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी सुरू असून, तक्रारीतील आरोप आणि बॅनरशी संबंधित तथ्यांची पडताळणी केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात धार्मिक भावना दुखावल्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली असून, तपासाच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.(Tirunelveli Ganesha controversy)
तिरुनेलवेलीमध्ये हिंदू संघटनांचा संताप देखील अनावर झाल्याचे दिसून आले. हिंदूंच्या आराध्य दैवताचा व्यावसायिक जाहिरातीसाठी अशा पद्धतीने वापर कशासाठी, असा सवाल करत हिंदू मुन्नानीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. ‘श्रद्धेचा बाजार मांडण्याचा अधिकार कुणी दिला?’ असा सवाल उपस्थित करत हिंदू मुन्नानीचे कार्यकर्ते दुकानासमोर जमा झाले. गणराय हे कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असून धार्मिक श्रद्धेशी संबंधित प्रतिमेचा मांसाहारी पदार्थाच्या जाहिरातीसाठी वापर केल्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वादग्रस्त फलक तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर जाहिरात फलक हटवण्यात आला.(Tirunelveli Ganesha controversy)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक