हिमालयातील रेल्वे प्रकल्पात आणखी एक मोठे यश;ऋषिकेश-कर्णप्रयाग मार्गावरील ४१वा बोगदा ब्रेकथ्रू पूर्ण

१०.८४७ किमी लांबीचा एस्केप टनेल-१ पूर्णपणे जोडला;आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीत रेल्वे विकास निगमची कामगिरी


Himalayan railway project 
 
मुंबई (Himalayan railway project) : ऋषिकेश-कर्णप्रयाग नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गिका प्रकल्पाच्या अंमलबजावणीत रेल विकास निगम लिमिटेडच्या ऋषिकेश प्रकल्प अंमलबजावणी युनिटने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दि.११ सप्टेंबर २०२६ रोजी एस्केप टनेल-१चा अंतिम ब्रेकथ्रू पूर्ण करण्यात आला. यामुळे या महत्त्वाकांक्षी हिमालयीन रेल्वे प्रकल्पातील ४१वा बोगदा ब्रेकथ्रू पूर्ण झाला आहे. एस्केप टनेल-१ची एकूण लांबी १०.८४७ किलोमीटर असून, अंतिम ब्रेकथ्रूनंतर हा संपूर्ण बोगदा आता दोन्ही टोकांपासून पूर्णपणे जोडला गेला आहे. या प्रकल्पातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लांब बोगदा ठरला आहे. (Himalayan railway project)
 
कठीण भूगर्भीय परिस्थितीत कामगिरी
 
एस्केप टनेल-१च्या बांधकामादरम्यान अत्यंत आव्हानात्मक हिमालयीन भूगर्भाचा सामना करावा लागला. संपूर्ण बोगदा मार्गिका अत्यंत टेक्टोनाइज्ड, बहुपदरी आणि मोठ्या प्रमाणावर फॉल्टेड खडकांच्या भागातून जाते. अनेक ठिकाणी खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिअरिंग तसेच तीव्र क्रशिंगची परिस्थिती आढळली. या प्रतिकूल भूगर्भीय परिस्थितीमुळे काही भागांमध्ये जाड मायलोनाइट झोन विकसित झाले होते. हे झोन प्रामुख्याने मेन बाउंडरी थ्रस्टच्या जवळच्या परिसराशी संबंधित आहेत. त्यामुळे बोगदा खोदकाम आणि बांधकामाच्या प्रक्रियेत अभियंत्यांसमोर मोठी तांत्रिक आव्हाने निर्माण झाली. या आव्हानांवर मात करत एस्केप टनेल-१चा अंतिम ब्रेकथ्रू साध्य करणे ही प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामगिरी मानली जात आहे. (Himalayan railway project)
 
प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल
 
या ब्रेकथ्रूसह ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पात आतापर्यंत ४१ बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण झाले आहेत. आता प्रकल्पातील उर्वरित पाच ब्रेकथ्रू पुढील एका वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी हिमालयीन रेल्वे प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गामुळे हिमालयातील दुर्गम भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्याच्या उद्दिष्टाला मोठी चालना मिळणार आहे. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत सुरू असलेल्या या प्रकल्पातील प्रत्येक बोगदा ब्रेकथ्रू हा अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.(Himalayan railway project)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर