निःशब्द तपस्येचा तेजस्वी अध्याय

    10-Sep-2026   

Maruti Khot

मालवणच्या मातीत रुजलेला एक स्वयंसेवक मुंबईच्या गजबजाटातही शाखेचा ध्यास विसरला नाही आणि पुन्हा मायभूमीत परतल्यावर विचार, संस्कार आणि समाजकार्य यांची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवत राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते, जिल्हा बौद्धिक प्रमुख, वाचनसंस्कृतीचे उपासक आणि असंख्य कार्यकर्त्यांचे वडिलकीचे छत्र अशी त्यांची ओळख जरी असली, तरी त्यांच्या आयुष्याचे खरे सार एका वाक्यात सामावते स्वतः झिजून इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारा दीप म्हणजे कै. मारुती भगवान खोत
 
शाखेत घडलेला स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचा समर्पित कार्यकर्ता, समाजाचा आधारवड आणि शेवटच्या श्वासापर्यंत कार्याचा ध्यास जपणारा एक निस्वार्थ कर्मयोगी असे नाव म्हणजे कै. मारुती भगवान खोत, अर्थात सर्वांचे लाडके आबा खोत. दि. १५ एप्रिल १९२७ रोजी मालवणच्या मातीत जन्मलेले आबा खोत यांचे संपूर्ण आयुष्य संघसंस्कार, समाजसेवा आणि राष्ट्रकार्य यांसाठी अर्पण झाले. पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी जिथे जबाबदारी मिळाली, तिथे ती स्वतःची साधना मानून निभावली. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व आजही मालवण परिसरातील अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहे.
 
मालवणमध्ये १९३६ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा सुरु झाली. आबांचे थोरले बंधू सुरुवातीपासूनच त्या शाखेत जात होते. त्या वातावरणाचा परिणाम लहानग्या मारुतीरावांवर झाला आणि अवघ्या दहा वर्षांच्या वयात, १९३७ मध्ये त्यांनी शाखेत प्रवेश केला. शाखेतील शिस्त, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी बालपणातच आत्मसात केली. १९४१ च्या जिल्हा शिबिरातील एक प्रसंग त्यांच्या स्वभावाची साक्ष देतो. रक्षणाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी त्या वेळचे जिल्हा संघचालक आजगावकर यांनाही अडवले होते. व्यक्तीपेक्षा कर्तव्य मोठे, हा संस्कार त्यांनी तेव्हाच कृतीतून दाखवून दिला होता. त्यांच्या जडणघडणीत शिवराय तेलंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पुढे त्यांनी संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षण पूर्ण करून स्वतःला संघकार्यासाठी अधिक सक्षम बनवले.
 
मॅट्रिकनंतर ते मुंबईला आले. परळच्या चाळीत राहून त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात ओव्हरसियर म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी उपजीविकेचे साधन होती; पण जीवनाचे ध्येय शाखाच राहिली. परळची शाखा त्यांनी उत्साहाने आणि उत्कृष्ट उपस्थितीसह चालवली. अनेक तरुण त्या शाखेतून घडले. पुढे त्यांच्याकडे अंधेरीचे सहकार्यवाह म्हणूनही जबाबदारी आली. ते उत्तम गीतगायक होते. अनेक उत्सवांमध्ये वैयक्तिक गीताची जबाबदारी त्यांच्याकडेच असे. त्यांच्या आवाजातून गीत केवळ ऐकवले जात नसे; ते स्वयंसेवकांच्या मनात संस्कार रुजवत असे. तरुणपणी त्यांनी बांदा येथे विस्तारक म्हणून कार्यही केले.
१९८१ मध्ये त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची जबाबदारी देण्यात आली. पुढील पाच-सहा वर्षे त्यांनी हे कार्य अत्यंत यशस्वीपणे उभे केले. संघाच्या संस्कारांना समाजव्यापी रूप देण्याचे काम त्यांनी मनापासून केले. १९८६ मध्ये त्यांनी मुंबईचा निरोप घेतला आणि कायमस्वरूपी मालवणला परतले. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हा बौद्धिक प्रमुखाची जबाबदारी आली. मालवणमध्ये त्यांनी अनेक वर्षे मासिक बौद्धिक वर्ग नियमित चालवला. विचारांची परंपरा अखंड ठेवण्याचे हे त्यांचे मोठे योगदान ठरले. १९९३ नंतर त्यांच्यावर विश्व हिंदू परिषदेच्या प्रखंड प्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये ते आधीपासूनच 'आबा' म्हणून ओळखले जात होते; कारण त्यांचा स्वभावच वडिलकीचा होता.
 
आबांनी मालवणमध्ये दर रविवारी परिवार शाखेचा अभिनव उपक्रम सुरू केला. या शाखेत २५ ते ३० जण नियमित उपस्थित राहत. शाखेसोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताच्या संस्थांची माहिती, त्यांच्या कार्याचे कथन आणि प्रेरणादायी चर्चा होत असे. वर्षभर अखंड चालणारा हा उपक्रम अनेक कुटुंबांना संघकार्याशी जोडणारा पूल ठरला.
 
संघाच्या कार्यकर्त्यांपुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांशी त्यांचा आत्मीय संपर्क होता. जेव्हा प्रकृतीमुळे प्रवास करणे कठीण झाले, तेव्हा त्यांना सक्रिय जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यात आले. परंतु त्यांच्या कार्याचा अध्याय तेथे संपला नाही. मालवणमधील श्री शिवाजी वाचन मंदिर हे एकेकाळचे गाजलेले वाचनालय कार्यकर्त्यांच्या अभावामुळे विस्कळीत झाले होते. आबांनी त्याची सूत्रे हाती घेतली. कार्यकारिणीची पुनर्रचना झाली आणि ते कार्यवाह झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली वाचनालय पुन्हा जिवंत झाले. याच माध्यमातून त्यांनी सार्थ रामायण परीक्षा सुरू केली. वाचनसंस्कृती आणि संस्कार यांचा सुंदर संगम त्यांनी घडवून आणला.
 
आबा केवळ संघटन उभारत नव्हते; ते माणसे घडवत होते. परळ शाखेत त्यांच्या तालमीत घडलेले गणेश माणगावकर पुढे मालवणचे तालुका कार्यवाह झाले. त्यांच्या वैयक्तिक अडचणीच्या काळात आबांनी सर्वार्थाने त्यांना आधार दिला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नीचीही तितकीच मोलाची साथ होती. त्यांचे घर अनेक कार्यकर्त्यांसाठी आपुलकीचे आश्रयस्थान बनले होते. उतारवयात मधुमेहाने त्यांना ग्रासले. त्यात नागीण झाल्याने तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या. वर्षभर या वेदनांशी झुंज देतानाही त्यांची चिंता स्वतःच्या प्रकृतीपेक्षा वाचनालयाची आणि कार्याचीच होती. पुढे हृदयविकाराचा त्रास वाढल्याने त्यांना जिल्हा संघचालक डॉ. म्हसकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही स्वतः रुग्ण असून इतर रुग्णांची चौकशी करणे, त्यांना धीर देणे हा त्यांचा स्वभाव शेवटपर्यंत बदलला नाही.
 
दि. २१ जानेवारी २००५ रोजी आबांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यांनी घडवलेले कार्यकर्ते आणि त्यांनी रुजवलेले संस्कार आजही जिवंत आहेत. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; त्यांनी संघकार्य केले नाही, तर संघकार्यच जगले. शाखेतील शिस्त, विश्व हिंदू परिषदेतील समर्पण, बौद्धिक वर्गातून विचारप्रसार, परिवार शाखेतून समाजजोडणी, वाचनालयातून संस्कारसंवर्धन आणि कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील वडिलकीचा आधार या सर्वांनी मारुतीरावांचे व्यक्तिमत्त्व एका शांत, पण तेजस्वी दीपस्तंभासारखे घडवले.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर