मुंबई : (Shri Ram Janmabhoomi Trust Audit) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या विविध तर्क-वितर्कांना आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांना अखेर पूर्णविराम लागलेला आहे. 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता किंवा पद्धतशीर भ्रष्टाचार झाल्याचे दावे गणितीयदृष्ट्या निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील रामभक्तांनी स्वेच्छेने दिलेल्या सुमारे ३,३०० कोटींच्या देणग्यांचा प्रत्येक रुपया स्वतंत्र बाह्य लेखापरीक्षक 'एम/एस व्ही. शंकर अय्यर अँड कंपनी' यांनी तपासून प्रमाणित केला आहे. मंदिर उभारणीसाठी खर्च करण्यात आलेले १,८०० कोटी रुपये तसेच जमीन संपादनासाठी खर्च झालेले ४०० कोटी रुपये हे सर्व व्यवहार बँकींग नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात आले असून, त्यामध्ये रोख स्वरूपातील कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. (Shri Ram Janmabhoomi Trust Audit)
अशी माहिती आहे की, चर्चेत असलेली घटना ही ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार नसून, हंडीतील रोख रक्कम मशीनद्वारे मोजणीपूर्वी हाताने वर्गीकरण करताना झालेल्या एका स्वतंत्र चोरीशी संबंधित आहे. या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी नियुक्त केलेल्या सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेच्या सहा बाह्य कर्मचाऱ्यांचा सहभाग सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आला. संबंधित सहाही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, त्यांचा मंदिर प्रशासन किंवा श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Shri Ram Janmabhoomi Trust Audit)
या प्रकरणाच्या तपासासाठी पुनर्गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटीच्या) कामकाजावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे थेट निरीक्षण आहे. तपासाची निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
जमीन खरेदीतील सर्व व्यवहार बँकांमार्फत
मंदिर परिसरातील जमीन खरेदीसंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांचेही खंडन करण्यात आल्याची माहिती आहे. मंदिरासाठी आवश्यक असलेल्या सलग भूखंडांच्या खरेदीसाठी १०० टक्के रक्कम अधिकृत बँक खात्यांमधून थेट बँक-टू-बँक हस्तांतरणाद्वारेच अदा करण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले. जमिनींच्या किंमती वाढल्याचे कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्या परिसरातील बाजारभावात झालेली वाढ तसेच व्यावसायिक बांधकामे आणि मालमत्तांच्या समायोजनासाठी द्यावी लागलेली भरपाई असल्याचेही सांगण्यात आले. (Shri Ram Janmabhoomi Trust Audit)
देणग्यांवर कोणताही परिणाम नाही
जून २०२६ मधील घटनेनंतरही रामभक्तांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासावरील विश्वास कायम असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत दरमहा हंडीतून सरासरी सुमारे ₹५ कोटींची देणगी जमा होत असून, देणग्यांमध्ये कोणतीही घट झालेली नाही, असे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबी लक्षात घेतल्यास श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात येणारे व्यापक गैरव्यवहाराचे दावे तथ्यांवर आधारित नसून, उपलब्ध लेखापरीक्षण अहवाल आणि तपास प्रक्रियेतून निधीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे पालन झाल्याचे अधोरेखित होते. (Shri Ram Janmabhoomi Trust Audit)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक