मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत
१५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा
खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी
ठाणे : (Mumbai Local) संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) अंतर्गत ५७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झालेली आहे. उपनगरीय रेल्वेच्या स्थितीत अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे. २०२४ मधील आकडेवारीनुसार अतिगर्दी, रेल्वे रुळ ओलांडणे आणि रेल्वेतून पडण्याच्या घटनांमुळे हजारो प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. सध्या १२ डब्यांच्या लोकलमध्ये क्षमतेपेक्षा चारपट अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने 'सुपर-डेन्स क्रश लोड'ची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, दरवाज्यांवर लटकून प्रवास करणे आणि अपघात होणे ही नियमित बाब बनली असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेच्या निदर्शनास आणून दिले. (Mumbai Local)
संसदीय समित्या आणि न्यायालयांच्या स्पष्ट निर्देशांनंतरही १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार, स्वयंचलित दरवाजे, फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे यांसारख्या मूलभूत सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होत असल्याची खंतही खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. (Mumbai Local)
यावर उपाय म्हणून सर्व १२ डब्यांच्या लोकलचे टप्प्याटप्प्याने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करावे, सर्व रेकमध्ये ऑटो-डोअर क्लोजिंग सिस्टीम अनिवार्य करावी तसेच स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निगराणी यंत्रणा उभारावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली. भविष्यात अशा दुर्दैवी मृत्यूंना आळा घालण्यासाठी या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. (Mumbai Local)