पुरी रथयात्रेला युनेस्कोचा वारसा दर्जा मिळवण्यासाठी ओडिशाची केंद्राकडे मागणी

    05-Aug-2026   
Jagannath Rath Yatra
 
मुंबई : (Jagannath Rath Yatra) भारताच्या सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक परंपरांपैकी एक असलेल्या पुरी रथयात्रेला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना पत्र लिहून पुरी रथयात्रेचा युनेस्कोच्या 'मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा' यादीत समावेश करण्यासाठी भारताच्या नामांकनाला प्राधान्याने पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. (Jagannath Rath Yatra)
 
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात केंद्रीय मंत्र्यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून हा प्रस्ताव युनेस्कोकडे लवकर पाठविण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी विनंती केली आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन, पुरी यांनी या नामांकनासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती निर्धारित नमुन्यानुसार आधीच सादर केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Jagannath Rath Yatra)
 
मुख्यमंत्री माझी यांनी रथयात्रेचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, महाप्रभू जगन्नाथांची रथयात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून भारताच्या समृद्ध सभ्यतेचे आणि सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. या उत्सवातून सर्वसमावेशकता, अध्यात्म, पारंपरिक हस्तकला, संगीत, नृत्य आणि समाजाच्या व्यापक सहभागाचे दर्शन घडते. त्यामुळे भारताच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे हे अद्वितीय प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, "महाप्रभू जगन्नाथांची रथयात्रा ही भारताच्या विविधतेचा आणि आध्यात्मिक मूल्यांचा कालातीत सांस्कृतिक आविष्कार आहे. शतकानुशतके साजरा होणारा हा उत्सव जगभरातील लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. तो राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक सातत्याचे प्रभावी प्रतीक आहे. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश झाल्यास भारताच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक स्तरावर अधिक प्रतिष्ठा मिळेल. यामुळे रथयात्रेचे जतन, संवर्धन आणि भावी पिढ्यांपर्यंत तिचा वारसा पोहोचविण्यास मोठी मदत होईल."(Jagannath Rath Yatra)
 
मुख्यमंत्र्यांनी रथयात्रेला भारताच्या जिवंत सांस्कृतिक वारशाचे सर्वात चिरंतन प्रतीक असे संबोधले. तिचा सामंजस्य, ऐक्य आणि मानवतेचा संदेश युनेस्कोच्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रस्तावाची तातडीने छाननी करून तो युनेस्कोकडे वेळेत पाठविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आवाहन त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला केले. 'या उत्सवाचे असामान्य सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, आपण वैयक्तिक हस्तक्षेप करून या नामांकन प्रक्रियेला प्राधान्य द्यावे,' अशी विनंतीही त्यांनी पत्रात केली.(Jagannath Rath Yatra)
 
ओडिशा सरकार आणि श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने या प्रक्रियेदरम्यान केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. नामांकन अधिक भक्कम करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा मदत देण्यास राज्य सरकार पूर्णपणे तयार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पत्राच्या शेवटी त्यांनी आशा व्यक्त केली की, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास भारताच्या सर्वात पूजनीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळेल, असे त्यांनी म्हटले.(Jagannath Rath Yatra)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर