मुलांची वाढ थांबते तेव्हा...

    25-Aug-2026
Distal Renal Tubular Acidosis
 
 
मुलांचे वय वाढत आहे; पण उंची आणि वजन मात्र त्या तुलनेत वाढत नाही. अशा वेळी पालक सहसा आहाराकडे लक्ष देतात. दूध, फळे, प्रथिनांचे आहारातील प्रमाण तपासतात. त्याने शरीराचे भरणपोषण नीट होते आहे का, याचाही विचार केला जातो. मात्र, आहार योग्य असूनही मुलाची वाढ होत नसेल, तर त्यामागे मूत्रपिंडाशी संबंधित आजारही असू शकतो. ‘एम्स भोपाळ’च्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
 
डिस्टल रिनल ट्युब्युलर अ‍ॅसिडोसिस’ अर्थात ‘डीआरटीए’ हा मूत्रपिंडाचा दुर्मीळ आजार. या आजारात मूत्रपिंड शरीरातील अतिरिक्त आम्ल योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही. त्यामुळे रक्तातील आम्ल आणि क्षाराचे संतुलन बिघडते. याचा थेट परिणाम मुलांच्या हाडांवर आणि वाढीवर होऊ शकतो. या आजाराचे निदान उशिरा झाल्यास मुलाची उंची कमी राहणे, हाडे कमकुवत होणे, पाय वाकणे आणि मूत्रपिंडामध्ये कॅल्शियम साचण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
 
‘एम्स’च्या अभ्यासात ९१ मुलांचा समावेश करण्यात आला होता. त्यांपैकी ७६ टक्के मुलांची उंची कमी होती, तर ५७ टक्के मुलांना मुडदूस झाला होता. या अभ्यासातून समोर आलेल्या निरीक्षणानुसार, तब्बल ७५ टक्के मुलांच्या मूत्रपिंडामध्ये कॅल्शियम साचल्याचेही आढळून आले आहे. तसेच या अभ्यासातील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, लक्षणे दिसू लागणे आणि निदान होणे यांमधील मोठा कालावधी. लक्षणे दिसण्याचे मध्यम वय १.५ वर्षे होते, तर निदान होण्याचे मध्यम वय ८.८ वर्षे होते. या विलंबाचा परिणाम गंभीर होता.
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सततची खुंटलेली वाढ, अति तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, रिकेट्स (मुडदूस), हाडांच्या समस्या किंवा पोटॅशियमची पातळी विनाकारण कमी असणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांचा अर्थ मुलाला ’डीआरटीए’ हा आजार आहेच असे नाही, परंतु त्यांची वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. आजाराचे लवकर निदान झाल्यास गुंतागुंत गंभीर होण्यापूर्वीच उपचार सुरू करण्यास मदत होऊ शकते.
 
योग्य वेळी उपचार केल्यास सुधारणा दिसून येत असल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ज्या मुलांना योग्य ’अल्कली उपचार’ मिळाले, त्यांच्या वाढीमध्ये दोन वर्षांच्या कालावधीत लक्षणीय सुधारणा दिसून आली; तरीही, अनेक मुलांची उंची त्यांच्या वयानुसार अपेक्षित उंचीपेक्षा कमीच राहिली.
 
मग अशा स्थितीत पालकांनी नेमके काय पाहावे? मुलाला वारंवार लघवी होत असेल, खूप तहान लागत असेल, अशक्तपणा जाणवत असेल किंवा त्याची वाढ वयानुसार होत नसेल, तर डॉटरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुलाची उंची आणि वजन सलग काही काळ अपेक्षेप्रमाणे वाढत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्त आणि लघवीच्या काही साध्या तपासण्यांमधूनही या आजाराची शयता लक्षात येऊ शकते. गरजेनुसार मूत्रपिंडाची सोनोग्राफी आणि अनुवांशिक तपासणीचाही आधार यासाठी अनेकदा घेतला जातो. हा आजार वेळेत लक्षात आल्यास, यावर उपचार करता येणे शक्य आहे. काही औषधांच्या मदतीने शरीरातील आम्लाच्या संतुलनामध्ये सुधारणा करता येते. त्याचा लाभ मुलांच्या वाढीसाठीही होतो. म्हणूनच, मुलाची वाढ खुंटणे, हे केवळ आहाराचे कारण समजण्याऐवजी त्यामागचे खरे कारण शोधणे यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
(प्रतिनिधी)




संबंधित मजकूर