साधारणत: १९७५च्या सुमारास स्रीमुक्ती चळवळ सुरु झाली. त्यानंतर स्त्री पुरुष समानता हा शब्द प्रचलीत झाला आणि आज या क्षेत्रात काम करताना काही प्रमाणामध्ये त्याचे विदारक स्वरुप समोर येते आहे. अनुरुपमध्ये काम करताना किंवा अगदी पुण्यामध्येही बाहेर हिंडताना अनेक मुली अलीकडे सर्रास धुम्रपान करताना दिसतात. त्याचप्रमाणे मद्यपान करणार्या महिलांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. तसे पाहिल्यास, मद्यपान अथवा अल्कोहोलला समाजामध्ये अनावश्यक प्रतिष्ठा मिळालेली आहे. कोणत्याही गप्पा, कोणताही आनंद साजारा करताना मद्यपान हे नेहमीचेच झाले आहे. हे समजासाठी खूप घातक असून, मानवी शरीरातील एकही अवयव असा नाही ज्याच्यावर मद्यपानाचा परिणाम होत नाही.
व्यसनाला मिळालेली ही प्रतिष्ठा समाजातील अनेक शक्तींवर घातक परिणाम करताना दिसत आहे. कोणत्याही गप्पा, कोणताही आनंद अल्कोहोलशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या शरीरातील एकही अवयव असा नाही ज्याच्यावर अल्कोहोल आणि निकोटीनचा परिणाम होत नाही. त्यातूनच पीसीओडी आणि पीसीओएस सारखे मासिक पाळीसंदर्भातील विकारांनी डोके वर काढले आहे. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणे आणि बाळाला जन्म देणे दिवसेंदिवस कठीणच होताना दिसते. यामुळेच आव्हीएफ क्लिनिकमधील गर्दी ओसांडून वाहताना दिसते. ज्यावेळेला एखादी मुलगी बाहेर काम करते, त्यावेळी तिचे म्हणणे असते की, मी जर बाहेर काम करते, तर घरात मी का काम करु? घरातील काम दोघांनीही करणे गरजेचे आहे, हे देखील तितकेच खरे. पण, त्यासाठी आपले बोलणे कसे असावे, एखादे काम समोरच्याकडून करुन घेताना, संवाद कसा साधला गेला पाहिजे याची जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे. ‘अरे ला का रे’करुन आयुष्याचे प्रश्न सुटत नसतात, याची जाणीवही पालकांनी मुला मुलींना करुन देणे महत्त्वाचे झाले आहे. या आदर्श संवाद पद्धतीविषयी पुढील लेखात सविस्तर चर्चा करुया.
स्त्री पुरुष समानता लांबून आकर्षक वाटणारी गोष्ट आहे. मात्र, प्रत्यक्षात स्री आणि पुरुष यांच्या मेंदूमध्येच भिन्नता असून, दोघांच्याही मेंदूत विविध प्रकारच्या क्षमता, विविध प्रकारची संरचना आढळून येते. जगाचे संचालन सुरुळीत राहाण्यासाठी शिवशक्तीचे ऐक्य आवश्यक आहे. ते एकत्र आले तरच, हे कार्य सुरळीत चालू राहणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल...
स्त्री-पुरुष समानता असे आपण म्हणतो, त्यावेळी खरेतर माणूस म्हणणे फार आवश्यक आहे. ज्यावेळी दोन माणसे एकत्र राहात असतात, त्यावेळी प्रत्येकाने असाच विचार केला पाहिजे की, आपण माणसाबरोबर राहात असून ज्या भावना, वेदना, यातना एखाद्या स्त्रीला होतात; त्या शास्त्रीय पद्धतीने पुरुषालाही होतात आणि पुरुषाला ज्या गोष्टी टोचतात, बोचतात, लागतात, तशाच त्या स्त्रियांनाही लागतात, हे दोघांनीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही संसारात, नात्यात ज्यावेळी स्त्री-पुरुष एकत्र येतात, त्यावेळी एकमेकांची जाणीव ठेवणे, एकमेकांना आदर देणे हा आपल्या संस़्कृतीचा पाया आहे. एकमेकांशी अत्यंत सभ्यतेने बोलणे आणि वागणेदेखील तितकेच आवश्यक असते. यासाठी स्वसंवादाकडे साकल्याने बघणेही तितकेच आवश्यक आहे. मानसशास्त्रीय भाषेमध्ये त्याला ‘सेल्फ टॉक’ असे म्हणतात. आता आपल्या मेंदूतील रचनेविषयी जाणून घेऊया. इंग्रजीमध्ये जॉन ग्रे नावाचे एक मोठे लेखक होऊन गेले, त्यांनी यावर सखोल विवेचन त्यांच्या ‘मेन आर फ्रॉम मार्स अॅण्ड विमेन फ्रॉम व्हेनस’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकानुसार स्त्री आणि पुरुष यांच्या मर्यादा, शक्ती या भिन्न आहेत. मात्र, ज्यावेळी ते दोघे एकत्र येतात,
तेव्हा ते उत्तम पद्धतीने काम करू शकतात.
- डॉ. गौरी कानिटकर