काश्मीरमध्ये ३६ वर्षांनंतर तपासाला वेग; कवी सरवानंद कौल प्रेमी दुहेरी हत्याकांडाप्रकरणी 'SIA' चे नऊ ठिकाणी मोठे छापे

    12-Aug-2026   

Kashmir Double Murder Case

श्रीनगर (Kashmir Double Murder Case) : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या सुरुवातीच्या काळातील एका अत्यंत क्रूर आणि संवेदनशील हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी राज्य तपास संस्थेने ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा कायदेशीर मोहीम उघडली आहे प्रसिद्ध काश्मिरी पंडित कवी, लेखक आणि समाजसेवक सरवानंद कौल 'प्रेमी' आणि त्यांच्या मुलाच्या १९९० मधील दुहेरी हत्याकांडाप्रकरणी ’SIA’ने आज, १२ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे काश्मीर खोर्‍यात आणि जम्मूमधील एकूण नऊ वेगवेगळ्या संशयित ठिकाणांवर एकाच वेळी धडक छापे टाकले. दि. २९ एप्रिल १९९० रोजी अनंतनाग जिल्ह्यातील सोफ-शली (दूरू) गावातील रहिवासी असलेले ८६ वर्षीय सरवानंद कौल ’प्रेमी’ हे खोर्‍यातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व होते त्यांनी 'भगवद्गीते' चा काश्मिरी भाषेत उत्कृष्ट अनुवाद केला होता आणि ते धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानले जात . स्थानिक मुस्लिम समुदायातही त्यांना प्रचंड आदर असल्यामुळे त्यांनी इतर पंडितांप्रमाणे काश्मीर खोरे सोडून न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दि. २९ एप्रिल १९९० च्या रात्री तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. त्यांनी घरातील दागिने आणि मौल्यवान वस्तू लुटल्या आणि सरवानंद कौल प्रेमी यांच्यासह त्यांचा २७ वर्षांचा तरुण मुलगा वीरेंद्र कौल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. दोन दिवसांनंतर, दि. १ मे १९९० रोजी, त्यांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह त्यांच्या गावापासून काही अंतरावर एका झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यांच्या शरीरावर सिगारेटचे चटके आणि अमानुष छळाच्या भीषण खुणा होत्या. या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण काश्मीर हादरले होते. (Kashmir Double Murder Case)


'SIA' ची आजची धडक कारवाई आणि पुरावेगेल्या ३६ वर्षांपासून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी कायदेशीर शिक्षेपासून दूर होते.केंद्र सरकारच्या प्रशासनाच्या ’शून्य दहशतवाद’ धोरणांतर्गत दहशतवाद्यांच्या फाईल्स पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ’SIA’ ने या प्रकरणाचा तपास अत्यंत गुप्ततेने पुढे नेला.: आज पहाटे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चोख बंदोबस्तात दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग (दूरू परिसर), श्रीनगर आणि जम्मू भागातील नऊ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, या शोधमोहिमेदरम्यान संशयितांच्या ठिकाणांवरून काही महत्त्वपूर्ण डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, सिम कार्ड), जुने दस्तऐवज आणि काही वैयक्तिक डायर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. या पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्या काळात दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर रसद पुरवणार्‍या, कट रचणार्‍या आणि माहिती देणार्‍या संशयितांच्या भूमिकेची चौकशी करणे हा या छाप्यांचा मुख्य उद्देश आहे. ३६ वर्षांनंतर सुरू झालेल्या या ठोस पुनर्तपासामुळे काश्मिरी पंडित समाजाने आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या गुन्ह्यातील दोषींना लवकरात लवकर कठोर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. (Kashmir Double Murder Case)





योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर