काशीत मुस्लिम बांधवांनी साजरी केली गुरुपौर्णिमा

    30-Jul-2026   
Kashi Guru Purnima
 
मुंबई : (Kashi Guru Purnima) काशीतील पाताळपुरी मठात गाझीपूर आणि मिर्झापूर येथून आलेल्या मुस्लिम समाजातील १०० हून अधिक नागरिकांनी डोक्यावर टोपी घालून गुरुदीक्षा घेतली. तसेच सनातन परंपरेनुसार गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत गुरुंचे पूजन करून त्यांचे आशीर्वादही घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही १०० हून अधिक मुस्लिम समाजातील नागरिक पाताळपुरी मठात दाखल झाले. त्यांनी गुरुंकडून मंत्रदीक्षा घेतली आणि सनातन धर्मातील परंपरेनुसार गुरुंचे पूजन केले. सनातन परंपरेनुसार सर्वांनी आपल्या गुरुंचे आशीर्वाद घेतले. यावेळी गुरु-शिष्य परंपरेत हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव दिसून आला नाही. गंगा-जमुनी संस्कृतीचे सुंदर दर्शन या कार्यक्रमात घडले. (Kashi Guru Purnima)
 
गाझीपूरहून गुरुदीक्षा घेण्यासाठी आलेल्या जाकीर यांनी सांगितले की, आमचे पूर्वज रामानंद संप्रदायाचे अनुयायी होते. त्यामुळे आम्ही आज आमचे गुरु बालकदास महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही त्यांचे शिष्य आहोत आणि ते आमचे गुरु आहेत. त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभावेत, अशी आमची इच्छा आहे. एखादा सण किंवा उत्सव कसा साजरा करायचा, हे प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. कट्टरतेचा दृष्टिकोन बाजूला ठेवून परस्पर समरसतेने राहणे आवश्यक आहे. (Kashi Guru Purnima)
 
गुरुदीक्षा घेण्यासाठी आलेले अफरोज अहमद म्हणाले की, धर्माच्या नावावर भेद निर्माण करणारे लोक चुकीचे आहेत. आपण सर्वप्रथम माणूस आहोत. समाजातून कट्टरता दूर झाली पाहिजे. येथे आल्यावर आम्हाला खूप आनंद आणि मानसिक समाधान मिळते. आम्ही आमच्या गुरुंकडे येतो, त्यांच्याकडून दीक्षा घेतो, त्यांची आरती करतो, पूजन आणि दर्शन घेतो. त्यामुळे मनाला मोठा दिलासा मिळतो. (Kashi Guru Purnima)
 
याप्रसंगी बालकदास महाराज म्हणाले की, ही जगद्गुरू रामानंदाचार्य यांनी कधीही जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही. जो कोणी श्रद्धा आणि भक्तीभावाने येथे येतो, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. प्रत्येक व्यक्तीला ज्ञानाचा आणि प्रकाशाचा मार्ग आवश्यक असतो. येथे येणारे लोक गंगा-जमुनी संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत आहेत. समाजात नकारात्मक विचार पसरवून फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कट्टर विचारसरणीला हे एक उत्तर आहे. यंदा १०० हून अधिक मुस्लिम बांधवांनी या मठात गुरुदीक्षा स्वीकारली. (Kashi Guru Purnima)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर