वाकडीची घटना निंदाजनक!
अपराध्यांना कठोर शासन झालेच पाहिजे
जळगाव, १५ जून :
जामनेर तालुक्यातील वाकडी या गावात मागासवर्गीय समाजाच्या दोन मुलांना नग्न अवस्थेत अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी मोठ्या प्रमाणात सर्वच माध्यमांमधून प्रसारित झाली. या अमानुष मारहाणीचा तीव्र निषेध करावा तेवढा कमीच आहे. पण या घटनेची वास्तविकता जाणून घेतली तर माध्यमांनी आणि राजकीय पक्षांनी रंगवलेले चित्र यात मोठी तफावत आढळते.
अखिल भारतीय समरसता मंचचे सदस्य रमेश बापू महाजन, तसेच कार्यकर्ते किशोर झंाबरे, महेश आहेराव व गुणवंत क्षीरसागर यांनी शुक्रवारी वाकडी गाव गाठून पीडितांचे घरी भेट दिली. समरसता मंचच्या सत्यशोधन समितीने घटनेतील वास्तव जाणून घेतले व आरोपींना योग्य शासन व्हावे यासंदर्भात आग्रह धरला आहे.
मातंग समाजाची दोन अल्पवयीन मुले गावातील जोशी यांच्या शेतातील विहिरीत पोहायला गेली होती. शेतमालक व त्यांच्या सहकार्यांनी या मुलांना पकडून नग्न अवस्थेत मारहाण केली. त्याचे भ्रमणध्वनीवर चित्रीकरण करण्यात आले. हा प्रकार निश्चितच निंदाजनक आहे. अमानुष मारहाण करणार्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. ज्या विहिरीत ही मुले पोहायला गेली होती, ती विहीर सुमारे ८० फूट खोल आणि पाण्याने भरलेली आहे. या विहिरीत पोेहताना अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही मुले विहिरीवर पोहण्यास आली असता, आरोपी (भटके विमुक्त समाजातील) ईश्वर जोशी, प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार यांनी या मुलांना पकडून मारहाण केली. अमानुष मारहाण ही निंदाजनकच आहे. या मारहाणीचे चित्रीकरण करणे
हे सुध्दा निंदाजनकच आहे.
गावात जातीय सलोखा आहे. या मुलांचे आजोबा वाकडीमध्ये ग्रामपंचायतीचे पाणी सोडण्याचे काम करतात. ते न चुकता त्यांचे कर्तव्य बजावत असतात. पीडित मुलांच्या आईने मान्य केले आहे की, ही मुले त्या विहिरीत पोहायला जायची. मात्र, केवळ राजकारणासाठी या संपूर्ण घटनेला जातीय रंग देवून जातीय सलोख बिघडविण्याचे कटकारस्थान असल्याचे दिसते. या वादाला युवकांमधील वादाचे कांगोरे आहेत. ज्या गावात कायम सलोखा आहे तेथील वातावरण राजकारणामुळे गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. अमानुष मारहाण करणार्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सलोखा कायम राखण्यासाठी वस्तुस्थितीसुध्दा पाहणे आवश्यक आहे.
अखिल भारतीय समरसता मंचचे सदस्य रमेश बापू महाजन, तसेच कार्यकर्ते किशोर झंाबरे, महेश आहेराव व गुणवंत क्षीरसागर यांनी आरोपींना योग्य शासन व्हावे यासंदर्भात आग्रह धरला आहे. समरसता मंच पीडितांच्या पूर्णपणे पाठीशी उभा राहिला आहे.
खासदार राहुल गांधी असंवेदनशील!
सवर्णांची माफी मागा : चंद्रकांतदादा
जळगाव येथे घडलेली घटना ही सवर्ण व अवर्ण यामध्ये झालेली नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी याविषयी केलेले वक्तव्य निषेधार्ह असून त्यांनी सवर्णांची माफी मागावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे दोन मुलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर पाटील म्हणाले की, वाकडी येथे घडलेल्या घटनेमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला ते अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असून ज्यांनी अन्याय केले ते भटक्या जमातीचे आहेत.
राजकीय लाभापायी वाद वाढवू नका!
वाकडी ग्रामस्थांचा आ. सत्तार यांना फटकार
जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका समाजातील तीन मुलांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय पुढार्यांचे पाय या गावाकडे वळू लागले आहेत. शुक्रवारी मात्र, वाकडीच्या ग्रामस्थांनी ‘राजकीय लाभापायी उगाच वाद वाढवू नका’, अशा शब्दात कॉंग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांना चांगलेच खडसावले. कॉंग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी सकाळीच वाकडी गाव गाठले. ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा करतांना ‘आमच्या गावात जातीयवाद नाही. तुम्ही राजकीय मंडळी वाद वाढवू नका’, असे स्पष्ट शब्दात सांगितले.