अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमाला अमिताभ बच्चन ते सलमान खान, अख्खं बॉलिवूड अवतरलं जामनगरमध्ये...
जामनगर : सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत येत्या जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, लग्नापुर्वीचे प्री वेडिंग कार्यक्रम सध्या गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळीच जामनगरमध्ये भरली आहे.
अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी हजर राहणाऱ्या प्रत्येक पाहूण्यांचे आदरातिथ्य अंबानी कुटुंबाकडून उत्कृष्ट आणि पारंपारिक पद्धतीने केले जात आहे. सर्व पाहुण्यांना विमानतळावरून आणण्यासाठी अंबानी कुटुंबाने विशेष सुविधा करण्यात आली असून प्रत्येक कलाकारासाठी वेगवेगळी गाडी पाठवून त्यांचे स्वागत केले जात आहे. यात बीएमडब्ल्यू, रेंज रॉवर, रोल्स रॉईससारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
जामनगरमध्ये संपुर्ण चंदेरी दुनियाच जणू काही अवतरली आहे असे दिसून येत आहे. अनंत-राधिकाच्या या शाही प्री वेडिंग कार्यक्रमाला रणबीर कपूर, आलिया भट्ट, राहा, नीतू कपूर, शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, अर्जून कपूर, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण या कलाकरांनी देखील हजेरी लावली आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, मेटाचे सीईओ मार्क झुकबर्ग, ब्लॅक रॉकचे अध्यक्ष लॅरी फिंक, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, वॉल्ट डिस्नीचे सीईओ बॉब इगर मेक्सिकन, कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जस्सिम अल थानी, इवांका ट्रम्प अशा अनेक परदेशी पाहूण्यांची देखील हजेरी असणार आहे.
अनंत यांना जामनगरबद्दल विशेष आपुलकी का?
जामनगरमध्ये प्री-वेडिंगचे कार्यक्रम करण्यामागचे आणखी एक कारण अनंत अंबानी यांनी सांगितले. अनंत यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला होता. त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची सुरुवात याच जामनगरमधून केली असल्यामुळे जामनगरबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे असून जामनगरमध्येच त्यांचेही बालपण गेले असल्यामुळे या जागेशी विशेष भावनिक नाते असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाची निवड करणाऱ्या जोडप्यांना भारतातच लग्न करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात हे वक्तव्य करत त्यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवरच ‘वेड इन इंडिया’चे आवाहन देशवासियांना केले होते.