नाशिक : आपला आक्रमक स्वभाव आणि कार्यशैलीमुळे प्रशासनावर पकड व मतदारांवर प्रभाव असलेल्या देवयानी फरांदे ( Devyani Farande ) तिसर्यांदा निवडणुकीला सामोर्या जात आहेत. मतदारसंघातील कोणताही प्रश्न तडीस नेण्याच्या हातोटीमुळे जनमानसात विकास करणार्या आमदार म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. फरांदे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी कोणतेही मुद्दे नसल्याने विरोधी उमेदवाराकडून वैयक्तिक आरोपांना प्राधान्य दिले जात आहे. तरीही नेटाने निवडणुकीला सामोर्या जाणार्या आमदार देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. देवयानी फरांदे यांच्याशी दै. ‘मुंबई तरूण भारत’ने बातचित केली असता त्यांनी, ‘मला जनता सांगत गेली आणि मी काम करत गेले’, अशी भावना व्यक्त केली.
पक्षाने आपल्याला तिसर्यांदा नाशिक मध्यची उमेदवारी दिली. याविषयी काय सांगाल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी मला तिसर्यांदा विधिमंडळामध्ये जाण्याची संधी उपलब्ध करुन देत मला उमेदवारी दिली. पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझ्या मतदारसंघातील मतदार मला बहुमताने निवडून देत पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
नाशिक मध्य मतदारसंघासाठी पुढील पाच वर्षांकरिता आपले काय व्हिजन असणार आहे?
2027 सालामध्ये ‘सिंहस्थ कुंभमेळा’ आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करणे, त्याबरोबरच नमामि गोदेसाठी एक डीपीआर तयार करण्यात आला असून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तो मंजूर करुन घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जेणेकरुन प्रदूषणमुक्त गोदावरीमध्ये येणार्या ‘सिंहस्था’चे नियोजन करता येईल. या दृष्टिकोनातून काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर नाशिक-त्र्यंबकेश्वर अध्यात्मिक कॉरिडॉर विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच रोजगार निर्माण करण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत नाशिकसाठी आणणे आणि आयटी पार्कचा विकास करणे हे माझ्या पुढच्या पाच वर्षाचे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने व्हिजन आहे.
विरोधी उमेदवाराकडून आपल्या विरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधकांना काय उत्तर देणार?
गेल्या दिड ते दोन वर्षापासून माझे विरोधक माझ्या विरोधात फेक नरेटीव्ह सेट करण्याच्या उद्देशाने कामाला लागले आहेत. त्यांच्या तोंडून आतापर्यंत एकही शब्द विकासाबाबत बाहेर आलेला नाही. पाच वर्ष तेदेखील आमदार होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणते विकासाचे काम पाच वर्षात केले. सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विधिमंडळात किती भाषणे केली. याच्यावर बोलायला पाहिजे. परंतु, अशा कुठल्याच प्रश्नावर न बोलता, अतिशय धादांत खोटे आरोप माझ्यावर करुन एक फेक नरेटीव्ह माझ्याविरुद्ध जनतेमध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता जनता सुज्ञ झालीय. लोकसभेमध्ये फेक नरेटीव्ह सेट केल्यामुळे काय परिणाम होतात. हे मतदारांनी बघितले आहे. त्यामुळे अशा खोट्या प्रचाराला बळी न पडता, निश्चित नाशिककर सुज्ञ असल्याने ते माझ्या पाठीमागे उभे राहतील.
नजरेत भरतील अशी कोणती विकासकामे मतदारसंघात करण्यात आली आहेत, की त्याचा विचार करुन मतदार आपल्याला मतदान करतील?
गेल्या दहा वर्षांमध्ये मी मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणावर विकासकामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्ष नाशिक शहराची ओळख बनून राहतील, असे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले आहेत. यात शहराची गरज असणारे वातानुकूलित मेळा बसस्थानक निर्माण केले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाला सुरूवात झाली. अनंत कान्हेरे मैदानाचा विकास, महिलांसाठी रुग्णालय, संदर्भ रुग्णालयाचा विकास, छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव, अटलबिहारी वाजपेयी उद्यान, जयप्रकाश छाजेड उद्यान आणि प्रमोद महाजन उद्यानासाठी नव्याने निधी आणून पुन्हा काम केले जाणार आहे. राघोजी भांगरे यांचे जिल्ह्यातले पहिले स्मारक माझ्या मतदारसंघात मी निर्माण केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करुन दिला. विविध मंदिरांसाठी निधी उपलब्ध करुन देत, समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मराठा आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभे केले जाणार आहे. रमाबाई आंबेडकर वसतिगृह बांधून पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी बौद्ध विहार निर्माण केले आहेत. समाजातील असा कोणताच घटक नाही की, ज्याच्यासाठी मी काम केले नाही. जनता मला सांगत गेली आणि मी काम करत गेले. जनतेला कधीच कोणत्याच कामाची वाट बघावी लागली नाही. खोटी आश्वासने मी कधीच दिली नाही. ताईंना सांगितले की, लगेच काम होते. हा विश्वास जनतेचा माझ्यावर आहे आणि तोच विश्वास मला निवडणुकीत विजयी करणार आहे.
सर्व घटकांसाठी आपण काम केले, तरीही काही घटकांना तुमच्याविरोधात भडकवण्याचे काम केले जात आहे. याबद्दल काय सांगाल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विश्वास’ या ब्रीदवाक्याप्रमाणे मी गेली दहा वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदुत्व हा विचार घेऊन राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून गेली. अनेक मी वर्ष काम करत आहे. राष्ट्रहित प्रथम आहे. परंतु, सर्वच समाजातील घटकांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण, माझ्या विरोधकांनी अल्पसंख्यांक समाजामध्ये माझ्या विरुद्ध चुकीचे नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते काही अंशी यशस्वीदेखील झाले आहेत.
विरोधकांनी विकासकामे करताना आणलेल्या अडथळ्यांविषयी तुम्ही काय सांगाल?
माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत, त्यांनी माझ्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेले महिला रुग्णालय उभारताना अडथळे आणले. मला न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागले. वेळोवेळी आंदोलने करावी लागली. विरोधी उमेदवाराच्या घराच्या अवतीभोवती अनेक खासगी रुग्णालये आहेत. परंतु, आजपर्यंत ते कधीच खासगी रुग्णालयाला विरोध करताना दिसले नाहीत. मात्र गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी उपचार केले जाणार आहेत, अशा शासकीय रुग्णालयाला त्यांनी विरोध करण्याचे पाप केले. माता भगिनींचे कल्याण होईल यादृष्टीने उभे करण्यात येणार्या शासकीय रुग्णालयाचे काम रखडवले. नाहीतर आतापर्यंत या रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन झाले असते आणि उपचाराला सुरूवात झाली असती. हे काम रखडवण्याला माझे विरोधी उमेदवारच सर्वस्वी जबाबदार आहेत. मतदार त्यांना या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवतील, याची मला खात्री आहे.