पाकिस्तानमध्ये प्राचीन हिंदू मंदिर पाडून उभारला मॉल
13-Apr-2024
Total Views |
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्यात एक हिंदू मंदिर पाडण्यात आले. हे मंदिर पाडून आता या ठिकाणी मोठी इमारत बांधली जात आहे. पाकिस्तान सरकारनेच हे मंदिर पाडण्याची परवानगी दिली होती. पाकिस्तानी न्यूज वेबसाइट डॉनने दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वामधील अफगाणिस्तान सीमेवर असलेल्या लेंडी कोटल शहरात हे हिंदू मंदिर पाडण्यात आले आहे. हे मंदिर लेंडी कोटलच्या बाजारात होते. १९४७ पासून हे मंदिर निर्जन होते.
१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी येथे राहणारे हिंदू भारतात आले. यानंतर मंदिर बंद करण्यात आले. १९९२ मध्ये या मंदिरावरही काही कट्टरपंथीयांनी हल्ला केला होता आणि काही भाग पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंदिराची स्थिती दयनीय होती आणि ते खूप प्राचीन असूनही, पाकिस्तान सरकारने त्याच्या संवर्धनासाठी पावले उचलली नाहीत आणि पाडण्यास मंजुरी दिली.
या मंदिराच्या जागी मोठी इमारत बांधण्यास सरकारने कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकारनेही या ठिकाणी कोणतेही मंदिर असल्याचे मान्य करण्यास नकार दिला. मंदिराच्या जागेवर नवीन इमारत कोण बांधत आहे, याची माहिती ना सरकारी अधिकाऱ्यांनी दिली ना जागेवर काम करणाऱ्या मजुरांनी.
महसूल विभागाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, लेंडी कोटलचा संपूर्ण बाजार क्षेत्र सरकारच्या मालकीचा आहे, परंतु त्यात मंदिराचा उल्लेख नाही. याच कारणासाठी बिल्डरला येथे मोठी इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अहवालानुसार, मंदिराच्या जतनाची जबाबदारी औकाफ बोर्डाची आहे. तथापि, लेंडी कोटल हे खैबर जिल्ह्यात आहे जे आदिवासी क्षेत्र आहे आणि मंडळाचे येथे कोणतेही कार्यालय किंवा कोणताही कर्मचारी नाही.
लेंडी कोटल येथे तैनात असलेल्या अन्य अधिकाऱ्यांनीही मंदिर पाडून उभारण्यात येत असलेल्या इमारतीबाबत अनभिज्ञता व्यक्त करून एकमेकांवर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे. एका अधिकाऱ्याने आपल्याकडे माहिती नसल्याचे सांगितले, तर दुसऱ्या अधिकाऱ्याने संपूर्ण प्रक्रिया पाळल्याचे सांगितले. मात्र, मंदिर पाडण्याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
डॉनशी बोलताना पाकिस्तान हिंदू व्यवस्थापन समितीचे हारून सरबदियाल म्हणाले की, मंदिराचे जतन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. ते म्हणाले की, मंदिराच्या जतनाची जबाबदारी जिल्ह्यातील अनेक विभागांवर आहे. असेच चालू राहिले तर सर्व हिंदू मंदिरे नष्ट होतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.