राहुल गांधींतर्फे लोकसभेसाठी आश्वासनांची खैरात; काय आहे काँग्रेसचा जाहीरनामा...
07-Mar-2024
Total Views | 53
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेआधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांसाठी पाच हमी दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर याबाबत माहिती दिली. या पाच हमीमध्ये सरकारी नोकरभरती, पहिल्या नोकरची हमी, पेपर लिक पासून स्वातंत्र्य, गिग इकॉनॉमी मध्ये सामाजिक सुरक्षा आणि स्टार्ट-अपसाठी विशेष निधीची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाने केलेल्या दाव्यानुसार, लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत आल्यास ३० लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी हमी दिली आहे. त्यासोबतच काँग्रेसने सांगितले आहे की, नोकर भरतीचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर केले जाईल. त्यानुसार कालबद्ध पद्धतीने नोकर भरती पूर्ण केली जाईल.
३० लाख नोकऱ्यांसोबतच, काँग्रेसने पहिल्या नोकरीची सुद्धा हमी देणारा कायदा आणण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास नवीन शिकाऊ अधिकार कायदा आणण्यात येईल. या कायद्यानुसार, प्रत्येक डिप्लोमा धारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनीत एक वर्ष शिकाऊ (प्रशिक्षण) हमी देण्यात येईल. या काळात प्रशिक्षणार्थींना दरमहा ८,५०० रुपये देण्यात येतील.
नोकर भरती आणि नोकरीच्या हमीनंतर काँग्रेसने पेपर लिक पासून सुटका मिळवून देण्याचे वचन दिले आहे. सार्वजनिक परीक्षांमध्ये कोणतीही संगनमत किंवा षडयंत्र टाळण्यासाठी आणि प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस नवीन कायद्यांची हमी देईल. कोट्यवधी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे नवे कायदे आणून आम्ही पेपरफुटी पूर्णपणे थांबवू, असे काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात सांगितले आहे.
नोकरीसोबतच काँग्रेसने गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षेची हमी देण्यासाठी सुद्धा कायदा आणण्याचे वचन दिले आहे. काँग्रेसने गिग इकॉनॉमीमध्ये दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगली कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कायदा आणण्याचे वचन दिले आहे. त्यासोबतच काँग्रेसने सरकार आल्यास स्टार्ट-अप क्षेत्राच्या वाढीसाठी ५००० कोटींचा निधी उभारणार असल्याची घोषणा केली.