"माझ्याही मनात सुशांत सारखा आत्महत्येचा विचार..", कंगनाने 'त्या' प्रकरणाबद्दल केले मोठे विधान
01-Mar-2024
Total Views | 56
सुशांत सिंहच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर कंगनानेही आत्महत्यचा विचार केला होता. जावेद अख्तर आणि कंगनात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान कंगनाने हे विधान केले आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यात कायदेशीर लढाई सुरुच आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फौजदारी खटला दाखल केला होता, याच प्रकरणी नुकतीच अंधेरी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कंगनाने एक धक्कादायक विधान केले. कंगना म्हणाली की, “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर माझ्याही मनात आत्महत्येचा विचार आला होता”.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या बातमीनुसार, कंगनाने कोर्टात सांगितले की, “सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचबद्दल ज्यावेळी समजले तेव्हा माझ्याही मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. चित्रपटसृष्टीत बाहेरील व्यक्तींना खूप त्रास देत त्यांचा छळही केला जातो. सुशांत सिंह राजपूत आणि मलादेखील याच अनुभवातून जावे लागले होते”, असे धक्कादायक विधान कंगनाने केले. दरम्यान, जावेद अख्तर यांचे वकील कंगनाची उलटतपासणी पुढील सुनावणीत करणार आहे.
२०१६ मध्ये अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत कंगनाचा वाद सुरु होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावलं आणि धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला होता. मात्र, जावेद अख्तर यांनी कंगनाचे हे आरोप फेटाळून लावले. कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी तिने जावेद अख्तर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. मात्र, यात काहीही तथ्य नसून नाहक आपली बदनामी केली जात असल्याचे जावेद अख्तर यांनी म्हणत कंगना विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.