सावरकर-नेताजी भेट

    27-May-2023
Total Views |
Vinayak Damodar Savarkar meet Netaji Subhash Bose

पारतंत्र्याच्या ढगांनी व्यापलेल्या आभाळाच्या क्षितिजावर पूर्व-पश्चिम दिशांना दोन तारे उगवले. सशस्त्र क्रांतीचा ध्यास उराशी तेवता ठेवून नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कोलकात्यात सुभाषबाबू. दोघांमध्ये समान धागे ठळकपणे स्पष्टपणे दिसतात. आपल्या दुर्भाग्यामुळे, नाकर्तेपणामुळे या तार्‍यांचं तेज आपण पेलवू शकलो नाही. आभासी सेक्युलॅरिझममुळे आपल्या देशाचं आजपर्यंत फक्त नुकसानच झालंय. अशा या दोन महान नेत्यांच्या भेटीची ही कहाणी...

  
विनायक दामोदर सावरकर सुखवस्तू सुशिक्षित कुटुंबात, तर सुभाषबाबू श्रीमंत उच्चभ्रू घरात जन्माला आले. एक ‘बॅरिस्टर’ तर दुसरे ‘आयसीएस.’ ऐशोआरामात जगण्याची संधी सोडून दोघांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. ब्रिटिश सरकारविरुद्ध शड्डू ठोकून आव्हान दिलं. राष्ट्रीय काँग्रेसशी दोघांचंही जमलं नाही आणि इथेच त्यांच्या संघर्षाची दिशा काहीशी एकाकी झाली. पण, दोघेही आपापल्या ध्येयापासून, तत्वांपासून तसूभरही ढळले नाहीत, अगदी अखेरपर्यंत! ब्रिटिशांच्या अरेला कारे करून, रक्त सांडल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, ही त्यांची धारणा होती. अखंड भारताचे दोघेही पुरस्कर्ते. सावरकरांनी युरोपिय देशांकडून ब्रिटिशांच्या विरोधात मदत घेतली, तर नेताजींनी रशिया, जर्मनी, जपान यांच्याशी लष्करी हातमिळवणी करून ब्रिटिश साम्राज्य हादरवून सोडलं. गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाचा या दोघांनी उघड उघड अस्विकार नोंदवला, असे हे तेजस्वी महानायक एकमेकांना भेटतात, तो प्रसंग आपल्या कल्पनेच्या पलीकडचा असणार हे निश्चित.

पार्श्वभूमी
 
सुभाषबाबूंनी एप्रिल १९३६ मध्ये युरोपातून भारतात येण्याचे आदेश धुडकावून लावले म्हणून त्यांना कैद झाली होती. मार्च १९३७ मध्ये त्यांची सुटका झाली. मे १९३७ मध्ये जेव्हा सावरकर शेवटी मुक्त झाले, तेव्हा नेताजींनी निवेदन प्रसिद्ध करून सावरकरांचे सार्वजनिक जीवनात स्वागत केले. सावरकर काँग्रेसमध्ये येतील, अशी आशा व्यक्त केली. पण, सावरकर हिंदू महासभेत गेले.
१९३८ मध्ये बोस काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेव्हाही त्यांचा एकमेकांशी फारसा संबंध आला नाही. भविष्यातील कोणत्याही गोलमेज परिषदेत केवळ काँग्रेसनेच भारताचे प्रतिनिधित्व करावे, असे त्यांनी सांगितले. तेव्हा, सावरकरांनी विरोध केला. बोस काँग्रेसच्या गांधीवादी नेतृत्वाशी भिडले आणि ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’च्या माध्यमातून एक पर्यायी राष्ट्रीय चळवळ निर्माण केली.हिंदू महासभेच्या राजकारणाविरुद्धही सुभाषचंद्र बोस यांचे ठाम मत होते, हे सर्वश्रुतच. त्यावरून आज विकृत राजकारण होते आहे. पण, संशोधनातून असे दिसून आले आहे की, बोस आणि सावरकर यांच्यात राजकीय मतभेद असूनही त्यांनी एकमेकांचा आदरच केला होता.

राजकारणातला वाद

ए. के. फजलुल हक यांच्या सरकारविरुद्ध हिंदू महासभेला बळ देण्यासाठी १९३९ मध्ये सावरकर बंगालमध्ये आले. बोस बंधू-सुभाष आणि मोठा भाऊ सरतचंद्र, ब्रिटिश सरकारला पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, जी. डी. बिरला आणि अर्थमंत्री नलिनी रंजन सरकार यांच्या सल्ल्यानुसार, गांधींनी केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले.बोस यांचे राजकीय मुखपत्र, ‘फॉरवर्ड ब्लॉक’ मध्ये सावरकरांच्या कोलकात्यामधील भाषणाला ‘टब-थंपिंग’ असे संबोधून त्यावर टीका केली. ‘हिंदू महासभा सर्व मुस्लिमांना एकत्र तोलून धार्मिक तेढ निर्माण करून, भारतीय राष्ट्रीयत्व बिघडवते आहे. जिनांनी ‘समस्त भारतीय मुस्लिमांच्यापैकी फक्त एक छोटासा तुकडाच वेगळा केला आहे. मुस्लीम समाजात हळूहळू राष्ट्रीयत्वाची भावना जागृत होत आहे. आम्ही सावरकरांप्रमाणे राष्ट्रवादी मुस्लिमांकडे दुर्लक्ष करू शकत नाही,’ हाच वादाचा मुद्दा, त्यावेळच्या राजकीय, सामाजिक स्थितीमुळे दोघांमध्ये होता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, राजकीय मतभेदांनंतरही, बोस यांनी मार्च १९४० मध्ये कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत हिंदू महासभेसोबत युती केली, याच्याकडे त्यांच्या चरित्रांमध्ये दुर्लक्ष झाले आहे. अर्थात, ही युती फार काळ टिकली नाही.बोस यांनी हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग यांना मतभेद बाजूला ठेवून, सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यालाही हिंदू महासभेनेच प्रथम प्रतिसाद दिला. बोस यांनी युतीचे श्रेय हिंदू महासभेतील राष्ट्रवादी घटकांना दिले. युती तुटल्यानंतर, नाराज सुभाषचंद्र बोस म्हणाले, “माझा महासभेला विरोध नाही. पण, काँग्रेसला विस्थापित करण्याच्या त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला आहे.“

योगायोगाने, निवडणूक युती होण्याच्या खूप आधी आणि जेव्हा बोस सावरकरांमध्ये वाद असताना ‘फॉरवर्ड ब्लॉक’च्या दि. ३० डिसेंबर, १९३९च्या एस. कृष्णा अय्यर यांच्या लेखात सावरकरांच्या सांप्रदायिक विचारसरणीबाबत निराशा व्यक्त करताना, व्यक्ती म्हणून सावरकरांची खूप स्तुती होती. लेखात म्हटले आहे की, “सावरकर हे शतकाच्या पहिल्या दशकातील स्वदेशी चळवळीतल्या, सर्वात रोमॅण्टिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. ते खरे ‘हिरो‘ आहेत. महाराष्ट्राच्या या धाडसी सुपुत्राची कारकिर्द ही त्यांच्या आयुष्यभराच्या दु:खात सोबती असलेल्या धाडसी स्वप्नांची आणि साहसांची एक दीर्घ रोमांचक कथा आहे. २५ वर्षांच्या काळातील अखंड बंदिवासानंतर एखादा माणूस पूर्णपणे पिळवटून गेला असता. पण, सावरकर या कसोटीला उत्तमपणे सामोरे गेले. ते एक उत्कट, बुद्धिमान आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची मानसिक जडणघडण आश्चर्यकारकरित्या पौलादी आहे.“ सुभाषचंद्रांच्या संमतीशिवाय हे डाव्या मुखपत्रात हे छापणे अशक्य आहे.


सावरकर-नेताजी भेट


सावरकर हिंदूसभेचे अध्यक्ष होते. द्वितीय महायुद्धाच्या या काळात, काँग्रेस सोडलेले सुभाषबाबू दि. २२ जून, १९४० रोजी सावरकर सदनात आले. वास्तविक, ते जिनांच्या भेटीसाठी आलेले होते. जिना हिंदूराष्ट्राचा पुरस्कार करणार्‍या सावरकरांनाच प्रमुख नेता मानीत. जिनांनी त्यांना आधी सावरकरांना भेटण्यास सांगितले.आंतरराष्ट्रीय वातावरण कोणत्या दिशेने जात आहे, यावर सावरकरांचं बारीक लक्ष होतंच. जपानमध्ये असलेल्या रासबिहारी बसूंशी त्यांचा गुप्त पत्रव्यवहार होताच. त्याआधारेच जपान दुसर्‍या महायुद्धात ब्रिटन विरोधात उतरण्याची शक्यता सावरकरांनी वर्तवली. सुभाषबाबूंसारख्या तेजस्वी तरुणाने बाहेरच्या देशात जाऊन त्यांचं सैनिकी साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि युद्धात गुंतलेल्या ब्रिटिश सत्तेला शेवटचा परिणामकारक टोला हाणावा, असा सल्ला दिला. रासबिहारींकडून आलेलं पत्रही त्यांच्या पुढ्यात टाकलं. इंग्रजांचे पुतळे हटवण्याच्या चळवळी करून नेताजींनी तुरुंगात सडत पडू नये, असा सल्लाही दिला. जर्मनीत बंदिस्त असलेल्या भारतीय सैनिक कैद्यांची सुटका करून भारतीय सैन्य तयार करा. या संपूर्ण चर्चेचा उल्लेख जपानी लेखक आणि प्रकाशक युकीकाझू साकुरासावा यांनी ‘द टू ग्रेट इंडियन्स इन जपान’ या पुस्तकात केला आहे.

नेताजींनी जर्मन सरकारची मदत घेऊन, रासबिहारींसह जपानशी हातमिळवणी करावी. रासबिहारी आणि नेताजी यांच्यातील पुलाचे काम सावरकरांनी केले. पण, नेताजींनी ठरल्याप्रमाणे इंग्रजांचे पुतळे हटवण्याची चळवळ केलीच. सावरकरांनी भाकीत केल्याप्रमाणे त्यांना अटकही करण्यात आली. तुरुंगात मात्र सावरकर सूचनेची त्यांना आठवण झाली असावी. त्यानुसार त्यांनी आपली दिशा ठरवली आणि एक दिवस आपली सुटका करून पलायन केले.चळवळीसाठी एक देशव्यापक युती करण्याच्या प्रयत्नात बोस, सावरकर आणि जिना यांना भेटले, पण ते स्पष्टपणे निराश झाले. त्यांनी आपल्या ‘द इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात लिहिले आहे की- “जिना त्यावेळी पाकिस्तान निर्मितीचा विचार करत होते आणि सावरकर मात्र तटस्थ राहून ब्रिटनच्या सैन्यात घुसून हिंदूंना लष्करी प्रशिक्षण कसे मिळवता येईल, याचाच विचार करत होते. म्हणून या दोन्ही नेत्यांना एकत्र आणणे शक्य नाही. “

सावरकरांकडूनही नेताजींचे गुणगान


सावरकरांनीही नेताजींचे जाहीर कौतुक केले. सावरकरांनी साजरा होणार्‍या ‘अखिल भारतीय सुभाष दिना’च्या आयोजकांना संदेश पाठवला आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली- “ते कुठेही असले तरी त्यांच्यासाठी सदैव राष्ट्राची कृतज्ञता, सहानुभूती, शुभेच्छा असेल, ते प्रेरणास्रोत राहतील.’‘ रा. स्व. संघाचेे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मधल्या त्यांच्या अखेरच्या मुलाखतीत, सावरकर भारताच्या स्वातंत्र्याचे श्रेय नेताजींना अधिक देतात.भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. ‘एकट्या काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले‘ ही कल्पनाच चुकीची आहे. असहकार, चरखा आणि १९४२च्या ‘भारत छोडो‘ चळवळीमुळे देशातून ब्रिटिश सत्ता संपली, असा विचार करणेही मूर्खपणाचे आहे. स्वातंत्र्य मिळालं, त्याचं पहिलं कारण म्हणजे, भारतीय राजकारण लष्कराकडे देण्यात आले, ज्याच्यावर ब्रिटिश अवलंबून होते; दुसरे, रॉयल इंडियन नेव्हीचे बंड आणि हवाई दलाचा धोका; तिसरे, नेताजी सुभाष बोस आणि ‘आयएनए’ची शूर भूमिका; चौथे, १८५७ मधील स्वातंत्र्यसमर; पाचवे, काँग्रेस, इतर गट आणि पक्षांचे हजारो क्रांतिकारक आणि देशभक्तांनी केलेले प्रचंड बलिदान.रशिया, जपान, जर्मनी यांच्याशी वाटाघाटी करून ‘आयएनए’सारखी सेना नेताजी उभी करू शकले. ब्रिटिशांवर चाल करून आले. नेताजी हे तात्यारावांहून वयाने १३-१४ वर्षांनी लहान. सावरकर अनुभवांनी शहाणे, त्यांच्या भेटीने त्यांना प्रेरणा न मिळाली तरच नवल. ब्रिटिशांशी त्यांच्याच भाषेत बोललं, तरच त्यांना नीट कळेल, एवढं सावरकरांकडून ते शिकले असं आज आपण नक्कीच म्हणू शकतो.या दोन तेज:पुंज प्रेरणास्रोतांच्या स्मृतींना वंदन!
 
 
-जाई ठाणेकर