भारतात इंधन व एलपीजी पुरवठा सुरक्षित; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी

13 Mar 2026 15:21:30
Hardeep Singh Puri
 
नवी दिल्ली : (Hardeep Singh Puri) पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असला तरी भारतात पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत सांगितले. त्यांनी संसदेत दिलेल्या निवेदनात देशातील इंधनसाठा, पर्यायी पुरवठा व्यवस्था आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
 
इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील तणावामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजी पुरवठा होतो. मात्र भारताने कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये विविधता आणल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. संघर्षापूर्वी भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४५ टक्के आयात होर्मुझ मार्गावरून होत होती, तर आता सुमारे ७० टक्के आयात पर्यायी मार्गांमधून होत आहे. भारत सध्या ४० देशांकडून कच्चे तेल आयात करतो. पुरी यांनी स्पष्ट केले की देशात पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एटीएफ आणि फ्युएल ऑईलचा कोणताही तुटवडा नाही. देशभरातील पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे.
 
पर्यायी मार्गांद्वारे एलएनजी कार्गो भारतात
 
नैसर्गिक वायूच्या बाबतीत भारत दररोज सुमारे ९० MMSCMD वायू देशांतर्गत उत्पादनातून मिळवतो. घरगुती पाईप गॅस आणि वाहनांसाठीचा सीएनजी पुरवठा १०० टक्के सुरू ठेवण्यात आला आहे, तर उद्योग आणि खत क्षेत्रासाठी नियंत्रित पुरवठा केला जात आहे. पर्यायी मार्गांद्वारे एलएनजी कार्गो भारतात आणले जात असल्याने वायू पुरवठा स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
 
हेही वाचा : प्रश्नोत्तराचा तास भाषण करण्यासाठी नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात सुमारे २८ टक्के वाढ
 
एलपीजीच्या बाबतीत भारताच्या गरजांपैकी सुमारे ६० टक्के आयात आणि ४० टक्के देशांतर्गत उत्पादनातून भागवले जाते. अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशिया यांसारख्या देशांकडूनही खरेदी सुरू करण्यात आली असून गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात सुमारे २८ टक्के वाढ करण्यात आली आहे.
 
हे वाचलत का? - गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
 
वितरण कालावधी सुमारे २.५ दिवसांवर कायम
 
देशातील ३३ कोटींहून अधिक कुटुंबांच्या स्वयंपाकघरात एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये याला सरकार प्राधान्य देत आहे. घरगुती सिलिंडरचा वितरण कालावधी सुमारे २.५ दिवसांवर कायम ठेवण्यात आला आहे. साठेबाजी रोखण्यासाठी शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांचे बुकिंग अंतर लागू करण्यात आले आहे.
 
पुरी यांनी सांगितले की जागतिक बाजारातील दर वाढले असतानाही ग्राहकांवरील भार कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत सध्या गंभीर जागतिक ऊर्जा संकटाचा सामना करत असला तरी देशातील इंधन पुरवठा सुरक्षित आहे, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
Powered By Sangraha 9.0