मुंबई–पुणे (Mumbai-Pune Expressway) या दोन महानगरांना जोडणाऱ्या राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवार, ३ फेब्रुवारी संध्याकाळपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर तब्बल २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहने कासवगतीने पुढे सरकत आहेत. विशेषतः लोणावळा घाट परिसरात परिस्थिती अधिक गंभीर असून हजारो प्रवासी तासन्तास अडकून पडले आहेत. (Mumbai-Pune Expressway)
ही वाहतूक कोंडी ३ फेब्रुवारी रोजी आडोशी बोगद्याजवळ झालेल्या गंभीर अपघातामुळे निर्माण झाली. ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली. या निर्णयामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली. (Mumbai-Pune Expressway)
मध्यरात्रीनंतर वाहतूक एका लेनवरून सुरू करण्यात आली असली, तरी तोपर्यंत झालेल्या विलंबामुळे कोंडी सुटू शकलेली नाही. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस वेवर तसेच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. खालापूर टोल नाक्यापासून ते लोणावळा आणि खोपोलीपर्यंत कोंडी पसरली आहे. (Mumbai-Pune Expressway)
वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना कळंबोलीपासून पुढे न जाण्याच्या सूचना दिल्या असून कोंडी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. वाहतूक विभागाकडून ४ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंतही अशीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Mumbai-Pune Expressway)
दरम्यान, दुपारी दोन वाजेपर्यंतही महामार्गावर वाहनांच्या रांगा कायम असल्याने अनेक प्रवासी संतप्त झाले. काही ठिकाणी लोक कारमधून बाहेर उतरून आपली नाराजी व्यक्त करताना दिसले. या कोंडीमुळे प्रवाशांची महत्त्वाची कामे खोळंबली असून मुंबई–पुणे प्रवास हा सध्या मोठा त्रासदायक ठरत आहे. (Mumbai-Pune Expressway)