मुंबई : (Ameet Satam) मुंबई महापालिकेत २५ वर्षांत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना केली.
अमीत साटम म्हणाले की, "ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहे. परंतू, १९९७ ते २०२२ या कालावधीत मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवत असताना वचननाम्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी का केल्या नाहीत? कारण त्या २५ वर्षात ते भ्रष्टाचार करण्यात आणि दर आठवड्याचा स्टँडिंग कमिटीचा हिशोब चुकता करण्यात खूप बिझी होते. २५ वर्षे मुंबई महापालिकेत बसून त्यांनी ३ लाख कोटींचा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आहे. विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रित लढली तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात ५० चा आकडाही ते गाठू शकले नाही. त्यामुळे आता ते एकत्र आले किंवा नाही आले तरी मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे." (Ameet Satam)
ही निवडणूक मुंबईसाठी महत्वाची
"मुंबई महापालिकेची निवडणूक ही मुंबईसाठी महत्वाची आहे. गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई शहरात जो विकास झाला तसाच विकास मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घडून यावा, मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन मिळावे आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मुंबईकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे," असेही अमीत साटम म्हणाले. (Ameet Satam)