इस्लामाबाद : जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्टने २५ वर्षानंतर पाकिस्तानातील आपले मुख्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का मानाला जात आहे. मायक्रोसॉफ्टचे पाकिस्तानच्या उद्योग, शिक्षण आणि सरकारी क्षेत्रात महत्वपुर्ण अस्तित्व होते. कंपनीच्या या निर्णयावरून पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे देशाच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे वक्तव्य केले आहे.
मायक्रोसॉफ्टने मोठा निर्णय का घेतला?
२००० ते २००७ पर्यंत पाकिस्तानातील मायक्रोसॉफ्टचे माजी व्यवस्थापक जवाद रहमान म्हणतात की, "कंपनीचा हा निर्णय स्थानिक व्यवसायाशी संबंधित असून कंपनीला सध्याच्या वातावरणात काम करण्यात भरपूर अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे."
माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही कंपनीचा हा निर्णय पाकिस्तानच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, " इथली राजकीय अस्थिरता, आर्थिक अस्थिरता, सरकारमध्ये वारंवार होणारे बदल, देशाचा बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्था, अस्थिर व्यापारी धोरणांमुळे कंपन्यांना पाकिस्तानमध्ये काम करणे कठीण होत आहे." असे ते म्हणाले.
कंपनीने घेतलेल्या निर्णयावर मायक्रोसॉफ्टचे प्रवक्ते म्हणतात की, "कंपनी बंद जरी होत असली तरी पाकिस्तानच्या ऑपरेटिंग मॉडेलमध्ये बदल करून कंपनीच्या सेवा आणि ग्राहकांसोबत असलेले कंपनीचे करार यावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही."