मुंबई : काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यांच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवार, ३१ जुलै रोजी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाने पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यावर त्यांनी प्रतक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "मालेगाव बॅाम्बस्फोट खटल्यांचा निकाल हा अनेक अर्थानी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचे कारस्थान या निकालाने हाणून पाडले आहे."
"तत्कालिन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथम हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला आणि नंतर शरद पवार यांनी अलिबाग येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात याचा उच्चार केला. चिदंबरम यांनी हीच भूमिका मांडली सातत्याने दहशतवादी घटनांमध्ये एकाच समाजाचे आरोपी सापडत असताना मतांच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करायचे कारस्थान रचले होते," अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.