लेह : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, २२ जून रोजी द्रास येथे 'सरहद्द शौर्यथॉन-२०२५' या स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, भारतीय सैन्यदलातील प्रमुख अधिकारी, सरहद्द संस्थेचे संजय नहार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. समुद्रसपाटीपासून १० हजार ८०० फूट उंचीवर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार धावपटू सहभागी झाले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पर्धकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे असे उद्देश असलेल्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल भारतीय सैन्यदल, आरहम फाऊंडेशन तसेच सरहद्द संस्थेचे विशेष आभार मानले.