नवी दिल्ली :(Pakistan has attempted to attack 15 cities in India)पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर' राबवून एअर स्ट्राईक केला. या लष्करी कारवाईनंतर गुरुवारी ८ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर अद्यापही सुरू असल्याचे म्हणत आतापर्यंत जवळपास १०० अतिरेकी मारले गेल्याचीही माहिती दिली. या मोठ्या कारवाईनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानकडून भारताच्या १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.
भारतातील १५ शहरांवर पाकिस्तानकडून मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. ७ मे आणि८ मे च्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमा भागात गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराने सीमा भागातील अनेक गावे रिकामी केली आहेत. भारतातील १५ शहरांमध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताकडून हाणून पाडण्यात आल्याची माहिती आहे. सीमेवरील प्रत्येक घडामोडीवर सरकारचे लक्ष आहे.